विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना काळात अनेकांनी आपले कुटुंबातील सदस्य, मित्र, नातेवाईक गमावले आहेत. या कठिण काळात प्रत्येक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आधीपासूनच दुर्लक्षित असलेले ज्येष्ठ नागरिक या काळात अधिक भरडले गेले आहेत. आर्थिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या ते खचल्याचे दिसत आहेत. देशातील काही महत्त्वाच्या शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले त्यामध्ये धक्कादायक खुलासे झालेले आहेत.
कोरोनामुळे जवळपास २०.८ टक्के ज्येष्ठांनी आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्रांना गमावले आहे. देशातील आरोग्य व्यवस्था आणि पायाभूत सुविधा अधिक बळकट असल्या असत्या तर या आप्तेष्टांना वाचविणे शक्य झाले असते, असे अनेकांचे मत आहे. देशातील ३,५२६ ज्येष्ठांचे सर्वेक्षण करून एक अहवाल तयार करण्यात आला असून, त्यामध्ये या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दुर्व्यवहार जागरुकता दिवसानिमित्त हेल्पएज इंडिया संस्थेने सहा शहरांमध्ये “द सायलेंट टारमेंटर ः कोविड-१९ अँड द एल्डरली” सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले. या अभ्यासात मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, चेन्नईमध्ये ३,५२६ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
सर्वेक्षणात सहभागी २०.८ टक्के लोकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य किंवा मित्र गमावले. गमावलेल्या लोकांना वाचविण्यासाठी काय केले जाऊ शकले असते, हा प्रश्न विचारण्यात आला. त्यात ५०.८ टक्के लोकांनी आरोग्य आणि पायाभूत सुविधा, ४४.४ टक्के लोकांनी लशीची उपलब्धता आणि ३८.७ टक्के लोकांनी वेळेवर औषधे, लशीची उपलब्धतेबाबत उत्तरे दिली.
कोरोनाबाधित झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याबाबत ४२.१ लोकांना सर्वाधि चिंता होती. ३४.२ टक्के लोक बाधित झाल्याने चिंतत होते. आणखी एक चिंता म्हणजे अनेक ज्येष्ठ दुसर्यांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून होते. सर्वेक्षणात ४१.१ टक्के लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून होते. सर्वेक्षणानुसार, कोविडमुळे ५२.२ टक्के ज्येष्ठांच्या मिळकतीवर परिणाम झाला. नोकरी जाणे (३४.९ टक्के) आणि कुटुंबीयांच्या वेतनात कपात (३०.२ टक्के) ही प्रमुख कारणे होती.
महामारीदरम्यान आरोग्य चांगले ठेवणे कठिण झाले. त्यामधील ५२.४ टक्के लोक सांधेदुखीने पीडित होते. ४४.९ टक्के लोकांना चालण्यास त्रास होत होता. २४.४ टक्के लोकांची दृष्टी खराब झाली. तर १३.८ टक्के लोकांना लक्षात ठेवण्याची समस्या तसेच एकाग्रता कमी असस्याचे आढळले.
सर्वेक्षणात, कोरोनावर लस बनविल्याची कल्पना ५८.२ टक्के ज्येष्ठांना होती. तर ४१.८ टक्के लोकांना याची कल्पनाच नव्हती. जागरुक लोकांमध्ये ७८.७ टक्के ज्येष्ठांना लसीकरण खूपच महत्त्वाचे असल्याचे लक्षात आले होते. ६६.६ टक्के लोकांना कोविड लशीचा कमीत कमी एक डोस मिळाल होता.
जवळपास ४३.१ टक्के ज्येष्ठांनी सांगितले की समाजात ज्येष्ठांसोबत दुर्व्यवहाराच्या घटना सुरूच आहेत. १५.६ टक्के ज्येष्ठांसोबत दुर्व्यवहार झाला. दुर्व्यवहाराचा धोका वाढल्याचे ६२.१ टक्के ज्येष्ठांना वाटले आहे. दुर्व्यवहार करणारे मुले (४३.८ टक्के) आणि सून (२७.८ टक्के) तर १४.२ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांच्या मुलींनी त्यांच्याशी दुर्व्यवहार केला. कोरोना काळात आम्हाला दुर्व्यवहार, हिंसाचार आणि वादांशी संबंधित आमच्या एल्डर हेल्पलाइनवर एक हजाराहून अधिक कॉल आले. आधीच्या कॉलच्या तुलनेत हे १८ टक्के अधिक होते.