कळवण – कळवण शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यु प्रमाण दुसऱ्या टप्प्यात वाढत आहे. त्यामुळे कळवण तालुक्यातील कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी कळवण शहर व तालुक्यात १२ ते १८ एप्रिल दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली कळवण येथील काँग्रेस भवनमध्ये झालेल्या सर्वपक्षीय नेते व व्यापारी महासंघ पदाधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला.
या संदर्भात कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, तहसीलदार बी. ए. कापसे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, मुख्याधिकारी डॉ सचिन पटेल यांना निवेदन देण्यात येऊन कळवण शहर व तालुक्यात सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारी महासंघ यांच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचे निवेदन स्वाक्षरीसह देण्यात आले.
कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, संचालक यांची शासकीय नियमांचे पालन करुन संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यात १२ एप्रिल ते १८ एप्रिल पर्यंत सप्ताहभर जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रशासनाने या कालावधीत कडक धोरणाचा अवलंब करावा, प्रशासनाकडून कोणावरही अन्याय होणार नाही अशी अपेक्षा बैठकीत पदाधिकारी व व्यापारी बांधवानी व्यक्त केली.