इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांची अत्यंत आवडती मालिका आहे. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. त्यातील भूमिका, पात्र, कथा हे सगळंच प्रेक्षकांना आपलंसं वाटत असल्याने टीआरपीमध्ये ही मालिका नेहमीच वरच्या क्रमांकावर होती. १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या मालिकेत सगळं काही आलबेल नाही, हे गेल्या काही काळापासून जाणवू लागलं आहे.
यातील कलाकार सातत्यानं मालिकेशी संबंधित व्यक्तींबाबत तक्रार करत आहेत. मिसेस रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने निर्माते असितकुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर बावरीची भूमिका साकारणाऱ्या मोनिका भदौरियाने निर्मात्यांवर टीका केली. मोनिकानेही त्यांच्यावर बरेच आरोप केले आहेत. निर्मात्यांनी पैसे दिले नाहीत आणि शूटिंगदरम्यान त्रास दिल्याचं तिने म्हटलंय. एवढंच नव्हे तर दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीबाबतही तिने मोठा खुलासा केला आहे.
रिटा रिपोर्टरचे आरोप
मालिकेत रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजाने देखील या मालिकेच्या निर्मात्यांवर आरोप केले आहेत. ही मालिका सुरू झाल्यापासून अभिनेत्री प्रिया आहुजा रिटा रिपोर्टरची भूमिका साकारत आहे. मात्र, आता आलेल्या अनुभवांबाबत प्रिया म्हणते, ”मालिकेत काम करताना मी मानसिक त्रास सहन केला. माझे पती मालव १४ वर्षांपासून शोचे दिग्दर्शक होते. असित मोदी, सोहेल रमानी कधीही माझ्यासोबत वाईट वागले नाहीत. पण कामाबाबत बोलायचं झालं तर माझ्यासोबत नेहमी चुकीचं वागलं गेलं. मालवसोबत लग्न झाल्यानंतर त्यांनी मला काम देणे कमी केले होते. याबाबत बोलण्यासाठी मी अनेकदा असित मोदींशी संपर्क केला पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही, असे रिटाने सांगितले. माझ्या पतीने १४ वर्ष मालिकेचं दिग्दर्शन केलं पण तरी त्यांना आदराची वागणूक मिळाली नाही. मालव सोडून गेल्याने म्हणून मलाही ९ महिन्यांपासून मालिकेत बोलावलं नाही.
कलाकारांना त्रास
‘बावरी’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिका भदोरियाने शोचे निर्माते आणि कार्यकारी निर्मात्यांविरोधात आवाज उठवला आहे. मोनिका भदोरियाने असित मोदी आणि शोच्या प्रॉडक्शन टीमवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. जो कलाकार शो सोडतो त्याचे पैसे अडकवून ठेवले जातात. तसेच कलाकारांना खूप त्रास दिला जातो. त्यांना एकमेकांपासून अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यांना सेटवर विनाकारण थांबवून घेतले जाते.
दया भाभी परतणार का
मोनिका म्हणते, “असितकुमार यांनी दिशाबरोबरही गैरवर्तन केलं असावं. पण तिने ते कधीच गांभीर्याने घेतलं नाही. ती म्हणायची, ‘छोडो, कोई बात नहीं’, ‘जाने दो.’ या मालिकेत दयाबेनचे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वाकानी सात वर्षे मालिकेपासून लांब आहे. दिशा वाकानीने २०१७ साली प्रेग्नन्सीमुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती मालिकेत परतण्याच्या चर्चा होत होत्या. पण दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर मालिकेत पुनरागमन करणार नसल्याचे सांगत दिशा वाकानीने या चर्चांना पूर्णविराम दिला होता.“दिशाला परत यायचं नाहीये. कोणीच या मालिकेत परत येऊ इच्छित नाही. दिशा या मालिकेची मुख्य कलाकार होती. तिला परत आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले. मात्र तिला मालिकेत परत यायचंच नाहीये, असं मोनिका सांगते.
TMKOC TV Serial Actress Serious Allegation