मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारी कार्यालये म्हटल्यावर चमच्यांची काही कमतरता नसते. पण मुंबई महानगरपालिका त्याला अपवाद ठरत आहे. कारण गेल्या वर्षभरात पालिकेतील जवळपास सात हजार चमचे गायब झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. अरेच्चा… तुम्ही वेगळच समजताय. इथे आम्हाला कॅन्टीनमधले चमचे म्हणायचे आहे.
होय. मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनमधील जवळपास सात हजार चमचे गेल्या वर्षभरात गायब झाले आहेत. केवळ चमचेच नाही तर ताटं, वाट्या, ग्लास अशा कितीतरी वस्तू गायब झाल्याची तक्रार कंत्राटदाराने केली आहे. त्यामुळे कंत्राटदाराला गेल्या वर्षभरात ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसानही भोगावे लागले आहे.
आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत म्हणून लौकीक कमावणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात असा प्रकार घडावा, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुंबईचा डोलारा सांभाळणाऱ्या मुंबई मुख्यालयाच्या उपहारगृहातून गेल्या वर्षभरात जेवणाची ताटे, चमचे, ग्लास अशी शेकडो भांडी गायब झाली आहेत. त्यामुळे भांडी आणि चमचे घरी घेऊन जाऊ नका असा फलकच पालिका मुख्यालयात लावण्यात आला आहे.
पालिकेतील काही कर्मचारी आणि अधिकारी जेवण, नाश्ता आपल्या कार्यालयातच मागवतात. जेवण झाल्यानंतर भांडी कार्यालयात तशीच ठेवली जातात, ती परत केली जात नाहीत. अधिकारी घरी गेल्यावर ताटं आणि चमचे चोरीला जातात. त्यामुळे वर्षभरात हजारो भांडी कमी झाली आहेत, असे उपहारगृहातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
ऐंशी हजार कोटींच्या ठेवी, तरीही…
मुंबई महानगरपालिकेचे बजेट अनेक राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. पालिकेच्या ठेवीच ऐंशी हजार कोटी रुपयांच्या आहेत. अश्यात जवळपास सात हजार चमचे, दोनशे ताटं, चारशे नाश्त्याच्या प्लेट्स, जवळपास दीडशे ग्लास गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. एवढ्या श्रीमंत महापालिकेतून एवढ्या साधारण वस्तू चोरिला कश्या काय जाऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भांडी देऊ नका
पालिकेतील कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांकडे सातत्याने भांडी परत करण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे. परंतु, तरीही उपहारगृहातील गायब झालेली भांडी परत आली नाहीत. त्यामुळे आता कुणी भांडी मागितली की ती द्यायची नाही, अशा स्पष्ट सूचना उपहारगृहातील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. एकही भांडे उपहारगृहाच्या बाहेर जाऊ देऊ नका, असा आदेशच देण्यात आल्याचे कळते.
Mumbai Municipal Corporation BMC Spoons Theft