अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
लासलगाव – शहरातील विंचूर – प्रकाशा राज्य मार्गावरील पथदीप गेल्या ४७ दिवसापासून बंद असल्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असल्यामुळे लासलगाव ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी शरद पाटील यांना शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील शहर प्रमुख प्रमोद पाटील, विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष भैय्या नाईक यांनी नागरिकांच्या वतीने टोपी व गुलाबाचे फुल देऊन तसेच कंदील भेट देऊन अनोखे आंदोलन केले.
या अनोख्या आंदोलनाच्या वेळी ग्रामसेवक शरद पाटील यांनी उडवडीची उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी त्यांची तक्रार जिल्हा परिषद नाशिकचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी साहेब यांना फोनवरून लासलगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी माहिती दिली. त्यांनी ग्रामसेवक शरद पाटील यांना लासलगाव शहरातील ४७ दिवसापासून बंद असलेले पथदिप, स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू करण्याबाबत व गावातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याबाबत सूचना केल्या आहे.
हे पथदिप बंद असल्यामुळे लहान मोठे अपघात देखील होत आहे. तसेच गाव भागातील, नवीन वसाहतीमध्ये ग्रामपंचायतने बसवलेले स्ट्रीट लाईट देखील कित्येक दिवसापासून बंद आहे. लासलगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे नागरिकांनी वेळोवेळी मागणी केली असता त्यांच्याकडून कुठली दखल घेतली जात नाही उडवा उडवीचे उत्तर मिळतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहे. त्यामुळे हे आंदोलन केल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी सांगितले.