नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य मंत्रिमंडळाचे खाते वाटप आज जाहीर झाले आहे. यासंदर्भात आता मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची प्रतिक्रीया दिली आहे. उद्या होत असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ते नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महाजन म्हणाले की, खाते जे मिळाले ते समाधानी असल्यासारखेच आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती पेललीच पाहिजे खाते कुठलेही असो आपण काम कसे करतो याला महत्व असते. जी जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देतील तसेच, पक्ष देईल ती जबाबदारी पेलणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
महाजन पुढे म्हणाले की, मला ग्रामविकास खाते मिळाले आहे. मी ग्रामीण भागातूनच निवडून येतो. बंजारा समाज आदिवासी वंजारी यांच्याशी जवळचा संबंध आहे. वैद्यकीय शिक्षण खातेही माझ्याकडे आहे. मागेही सर्वत्र चांगले उपक्रम आपण हाती घेतले होते. सर्वसामान्यांशी निगडित खाते असल्याने मला या खात्यात रस आहे. सोबत क्रीडा खाते आहे. मी स्वतः खेळाडू आहे. अनेक खेळ खेळलो आहे. मी अष्टपैलू होतो. क्रीडा विभागात बोगस सर्टिफिकेट आणि इतर प्रकार उघडकीस आले होते. त्याबाबत चौकशा सुरू आहेत. मी कार्यभार हाती घेतल्यावर यात लक्ष घालेल, असे महाजन म्हणाले.
महाजन यांनी सांगितले की, जी चर्चा आहे त्याव्यतिरिक्त काहीतरी होणार आहे अशी कल्पना फडणवीस यांनी आधीच दिली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे चांगले खाते ठेवले असे विरोधी पक्षाला काहीतरी बोलायचे म्हणून म्हणत आहेत. केवळ वीस मंत्र्यांवर सरकार चालेल असे शक्य नाही. बाकी मंत्री मंडळ विस्ताराला जास्त वेळ लागणार नाही. काही अडचणी नाही सर्व तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत. ४० ते ४२ मंत्री लवकरच कारभार हाती घेतील. पालकमंत्री अजून ठरलेले नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. खातेवाटप बाबत कोणी मंत्री नाराज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Minister Girish Mahajan on Portfolio allocation