इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तेलंगणाच्या हद्दीत मेडीगड्डा धरणाजवळ असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात सहा मुले बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. रात्री उशीरापर्यंत शोध मोहीम सुरु होती. मात्र मुले सापडली नाही. या घटनेची माहिती मिळताच मुलांच्या कुटुंबातील सदस्यांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
महाराष्ट्राचा शेवटचा तालुका सिरोंचा तालुका असून तेथे सीमेवरुन गोदावरी नदी वाहते. दोन राज्यातील सीमेवरुन वाहणा-या या नदीच्या पलीकडे तेलंगणाच्या हद्दील मेडीगड्डा धरणाजवळ असलेल्या गोदीवरी नदीच्या पात्रात ही मुलं आंघोळीसाठी गेली होती. तेथे ही दुर्घटना घडली.
मच्छीमारांची मदत घेऊन तेलंगणा पोलिसांकडून बुडालेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे. गोदावरी नदीला वाहतं पाणी असल्याने या पाण्यात मुले वाहून गेल्याचा अंदाज आहे.
गोदावरी नदीची लांबी १,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे. गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. साधारणत: आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्र प्रदेशात मिळते. गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेश राज्यांची जीवनवाहिनी समजतात.ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. त्याच सोबत नांदेड शहराला गोदावरीचे नाभी-स्थान म्हणून ओळखले जात आहे.