इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आध्यात्मिक भक्ती, शारीरिक तंदुरुस्ती आणि पर्यावरण जागरूकतेचा अनोखा संगम घडवणारी चौथी अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी संमेलन – 2025 मोठ्या उत्साहात आणि एकतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. फिट इंडिया संडेज ऑन सायकल हा भव्य कार्यक्रम भारतीय क्रीडा प्राधिकरण, प्रादेशिक केंद्र – मुंबई आणि पंढरपूर सायकल वारी संघ यांनी संयुक्तरित्या आयोजित केला होता.
या उपक्रमात महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशातील ९० हून अधिक सायकलिंग क्लबचे प्रतिनिधित्व करणारे 5000 हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते. या सायकलस्वारांनी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पावन तिर्थक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचण्यासाठी 3-4 दिवस आधीच 400 ते 450 किलोमीटरचा प्रवास केला. या सायकलस्वारांनी आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या नगर प्रदक्षिणा आणि उत्साही रिंगण सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला. याप्रसंगी त्यांनी अभूतपूर्व दृढनिश्चय, भक्ती आणि सहनशक्तीचे दर्शन घडवले.
भारत सरकारच्या केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री रक्षा खडसे, महाराष्ट्र सरकारच्या ग्रामीण विकास आणि पंचायती राज विभाग मंत्री जे. बी. गोरे यांच्यासारख्या अनेक मान्यवरांच्या सन्माननीय उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यांच्याशिवाय या कार्यक्रमात खासदार धैर्यशील मोहिते पाटील, विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक, विधान परिषदेचे सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई येथील प्रादेशिक केंद्राचे प्रादेशिक संचालक (आयआरएस) पांडुरंग चाटे आणि नागपूर येथील प्रसिद्ध सहनशक्ती सायकलपटू तसेच 19 वेळा आयर्नमॅन किताब पटकावणारे डॉ. अमित समर्थ यांचा समावेश होता.
फिट इंडिया – संडेज ऑन सायकल उपक्रमा अंतर्गत पंढरपूर येथील रेल्वे मैदान ऊर्जा आणि प्रेरणेचे एक चैतन्यशील केंद्र बनले होते. या कार्यक्रमाने पर्यावरणपूरक वाहतूक, सामुदायिक आरोग्य आणि आध्यात्मिक ऐक्याला प्रोत्साहन देणारा एक शक्तिशाली संदेश दिला. तसेच सायकलिंग हा केवळ एक खेळ नाही तर निरोगी आणि हरित भारताकडे वाटचाल करणाऱ्या जीवनशैलीचा भाग आहे, हे या आयोजनाने अधोरेखित केले.
फिट इंडिया चळवळीच्या भावनेला प्रतिध्वनीत करत, या कार्यक्रमाने राष्ट्रीय आरोग्य मंत्राचा प्रचार केला: “फिटनेस का डोज, आधा घंटा रोज”, प्रत्येक नागरिकांनी दररोज किमान अर्धा तास शारीरिक व्यायाम करून स्वतःचे आरोग्य सुधारावे आणि पर्यावरण स्नेही भारत घडवण्यास हातभार लावावा असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले.