मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या फेब्रु-मार्च २०२६ च्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरावयाच्या तारखेस (नियमित शुल्क) २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना मुदतीत अर्ज भरण्यास अडचण निर्माण होऊ शकते, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निर्देश दिले होते. त्यानुसार मंत्री दादाजी भुसे यांनी राज्य मंडळास केलेल्या सूचनेनुसार मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या फेब्रु-मार्च २०२६ च्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.
व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन परिक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन भरावयाच्या तारखेस (नियमित शुल्क) २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे फेब्रु-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) स्वीकारण्याच्या तारखांना देखील १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
नवीन परीक्षा केंद्र मान्यतेचे प्रस्ताव स्वीकारण्यास १० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या दहावी व बारावी परीक्षेसाठी नवीन परीक्षा केंद्र मान्यतेचे प्रस्ताव ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत स्वीकारण्यात यावेत, असे कळविण्यात आले होते. सदर नवीन परीक्षा केंद्रासंदर्भातील मान्यतेचे प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात येत असून असे प्रस्ताव १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत स्वीकारण्यात यावेत, असे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.