नवी दिल्ली – सिरियल किलरविषयी आता पर्यंत अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. पण पाकिस्तानी सीरियल किलरची कहाणी पूर्णपणे वेगळी आणि भरारक आहे. या सिरियल किलरने एक किंवा दोन नव्हे तर १०० मुलांची निर्घृणपणे हत्या केली. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे या भयानक किलरने १०० मुलांना ठार करण्याचे शपथ वाहिली होती. यानंतर मारेकऱ्याने आपले काम संपल्यानंतर आत्मसमर्पण केले होते.
वास्तविक, ही घटना डिसेंबर १९९९ ची आहे आणि या किलरचे नाव जावेद इक्बाल होते.
लाहोरमधील एका उर्दू वर्तमानपत्राच्या संपादकाला एक पत्र आले की, ‘माझे नाव जावेद इक्बाल आहे आणि मी १०० मुलांना ठार मारले आणि जावेद यांनी आपल्या पत्रात असेही सांगितले की, त्याने ज्या मुलांची हत्या केली त्यापैकी बहुतेक जण पळून जाणारे किंवा अनाथ होते.
जावेद इक्बाल याने आपल्या पत्रात सर्व मुलांना ठार मारल्याच्या जागेचा उल्लेखही केला होता. जावेदने आपला गुन्हा कबूल करून लाहोर पोलिसांना पत्र पाठविले. मात्र पोलिसांनी जावेदचे पत्र गांभीर्याने घेतले नाही.
वृत्तपत्राच्या संपादकाने मात्र ही बाब गांभीर्याने घेतली आणि आपल्या एका पत्रकाराला पत्रात नमूद केलेल्या जागी पाठवले. त्याठिकाणी पोहोचल्यानंतर त्या पत्रकाराला घराच्या आत रक्ताचे डाग दिसले. इतकेच नाही तर दोन मोठ्या बॅगमध्ये मुलांची शूज आणि कपडेही होते. तसेच एक डायरी देखील होती ज्यात मुलांची नावे आणि माहिती लिहिलेली होती.

घराबाहेर हायड्रोक्लोरिक अॅसिडने भरलेले दोन कंटेनर देखील होते. ज्यामध्ये मुलांच्या हाडांचे सापळे देखील होते. हे भयानक दृश्य सर्व पाहिल्यानंतर पत्रकार ताबडतोब त्याच्या कार्यालयात पोहोचला आणि संपादकास सर्व गोष्टी सांगितल्या. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.
सदर माहिती मिळताच पोलिसांची टीम जावेद इक्बालच्या लपण्याच्या ठिकाणी पोहोचली आणि हत्येचे सर्व पुरावे जप्त केले. यासह पोलिसांना पत्रात लिहिलेल्या प्रमाणे वस्तूंबरोबरच तेथे एक वही सापडली, या वहीत म्हटले होते की, हत्येचा पुरावा म्हणून मी काही मृतदेह सोडले आहेत, आता मी रावी नदीत उडी मारून आत्महत्या करणार आहे. या घटने प्रकरणी त्वरित कारवाई करत पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि रवी नदीच्या कोपऱ्याकोपऱ्यात शोध घेतला. पाकिस्तानच्या इतिहासातील हे सर्वात मोठे सर्च ऑपरेशन होते, परंतु जावेदचा मृतदेह कोठेही सापडला नाही.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी जावेदच्या दोन साथीदारांना अटक केली आणि त्यांची चौकशी करण्यास सुरवात केली. चौकशी दरम्यान त्यातील एकाने छतावरून उडी मारून आत्महत्या केली. या सर्वांच्या दरम्यान जावेद इक्बालने त्याच उर्दू वर्तमानपत्राच्या कार्यालयात, जिथे आधी पत्र पाठवले होते. तेथेच संपादकाची भेट घेतली आणि पुढे सांगितले की, आपण शरण जाण्यास आलो आहे. जेव्हा त्याची मुलाखत संपली तेव्हा पोलिसांनी त्याला लगेच अटक केली.
