हाथरस (उत्तर प्रदेश) – येथील सामुहिक बलात्कार प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. वाढत्या दबावामुळे त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहूल गांधी व प्रियंका गांधी यांनी अखेर शनिवारी सायंकाळी पिडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबाचे सांत्वन केले.
शनिवारचा दिवस अनेक घटना आणि घडामोडींचा ठरला. पिडीत कुटुंबाची भेट घेण्यासाठी जाण्याची घोषणा राहूल व प्रियंका यांनी केल्यानंतर पुन्हा वातावरण तापले. अखेर गांधींसह ५ काँग्रेस नेत्यांना भेट गेण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली. यावेळी तेथे प्रचंड गर्दी जमली होती. राहूल व प्रियंका यांच्यासह के सी वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी व पु ल पुनिया यांनी कुटुंबाची भेट घेतली. सीबीआय नको तर आम्हाला न्यायालयीन चौकशी हवी असल्याचे पिडीतेच्या कुटुंबियांपैकी काही जणांनी मागणी केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, हाथरस येथे प्रियंका गांधी यांच्याशी उत्तर प्रदेश पोलिसांनी असभ्य वर्तन केले त्यांचे कपडेही पकडले. याबद्दल देशभरात उत्तर प्रदेश पोलिसांविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तर, काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. वरिष्ठ महिला नेत्याशी असे वर्तन होते तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वसामान्य महिला कशा सुरक्षित असतील, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे.