लखनऊ (उत्तर प्रदेश) – येथूल सामुहिक बलात्कार प्रकरणाचा तपास अद्यापही अपूर्णच असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने हाथरस येथील घटनेच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) अहवाल सादर करण्यासाठी आणखी १० दिवसांचा कालावधी दिला आहे. अतिरिक्त मुख्य गृहसचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी याबाबत माहिती दिली आहे. चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार एसआयटीला अहवाल सादर करण्यासाठी वाढीव मुदत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
हाथरस घटनेसाठी गृहसचिव भगवान स्वरूप यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीला बुधवारी अहवाल सादर करावयाचा होता. परंतु, अद्याप तपास पूर्ण न झाल्यामुळे एसआयटीला वाढीव मुदत देण्यात आली आहे. एसआयटीने पोलिसांसह सुमारे १०० जणांची जबानी नोंदवल्या असून काही पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचे उघडकीस आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार ३० सप्टेंबर रोजी गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली. पुढील सात दिवसात एसआयटी अहवाल सादर करणार होती मात्र त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. एसआयटीमध्ये डीआयजी चंद्र प्रकाश आणि एसपी पूनम हे सदस्य आहेत. एसआयटीने हाथरसमधील महिलेच्या कुटूंबाला भेट देण्यासह अनेक मुद्द्यांवर तपास सुरु असल्याचे सांगितले आहे. हाथरस घटनेची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी योगी आदित्यनाथ यांनी शिफारस केली आहे.