रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लोकचित्रशैलींचा तारणहार!

by India Darpan
सप्टेंबर 13, 2020 | 11:24 am
in इतर
1
20200906 212213

संशोधकवृत्तीच्या व कलाप्रेमी असणाऱ्या भास्कर कुलकर्णी यांनी मधुबनी आणि वारली या लोकचित्रकला उजेडात आणल्या. त्यांची उद्या ( १४ सप्टेंबर) नव्वदावी जयंती आहे. त्यानिमित्ताने हा लेख…
– संजय देवधर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि वारली अभ्यासक आहेत)
दुर्गम भागात महिलांनी जोपासलेल्या या दोन्ही लोकचित्रशैलींंचे ते तारणहार ठरले. आज मधुबनी व वारली चित्रकला या आदिम कला जगभरात पोहोचल्या असून कलारसिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरल्या आहेत. त्याचे श्रेय अर्थातच कुलकर्णी यांच्या अथक परिश्रमांंना, दूरदृष्टीला आहे.अवघे ५३ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या कुलकर्णींंनी लोकचित्रकलेसाठी खुप मोठे योगदान दिले.
महाराष्ट्रातील आदिवासी वारली चित्रशैली आणि बिहारमधली मधुबनी कला यांचा शोध ६०-७० च्या दशकात लागला. त्याचे श्रेय अर्थातच भास्कर कुलकर्णी या कलंदर अवलियाकडे जाते. या संवेदनशील भटक्या कलाकाराने बिहारमधील जितवारपूर, दरभंगा या भागातील मधुबनी कला उजेडात आणली. डहाणू तालुक्यातील पाड्यांवर व गंजाड परीसरात जाऊन आदिवासी वारली चित्रशैलीला प्रकाशात आणले. आदिवासींमध्ये देवासमान असलेल्या त्यांना मतभेदांमुळे परतावे लागले. बिहारमध्ये मात्र त्यांच्या पश्चात त्यांचे मंदिर उभारले गेले. आयुष्यभर अनेक अपमान, उपेक्षा, अवहेलना सोसून या कलंदराने कलेसाठी अवघे जीवन समर्पित केले. त्यांच्या अथक प्रयत्नांनीच या दोन्ही कला जागतिक कॅनव्हासवर विराजमान झालेल्या आहेत.
साधारण १९६३ च्या सुमारास बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात जाऊन भास्कर कुलकर्णी यांनी तेथील महिलांनी जपलेल्या कलेचा शोध घेतला. नंतर १९७१ दरम्यान ठाणे जिल्ह्यातील डहाणू परिसरात दुर्गम पाड्यांवर फिरताना वारली चित्रशैली त्यांच्या निदर्शनास आली. झोपडीच्या भिंतीवर रंगवलेली चित्रे बघून अक्षरशः झपाटलेल्या अवस्थेत त्यांनी ती कला महिलांकडून जाणून घेतली. काही वर्षे बिहारमध्ये घालवलेल्या कुळकर्णींनी १९८० पर्यंत डहाणूजवळच्या गंजाड येथे राहून वारली जमातीच्या उद्धारासाठी सर्वस्व वेचले. नंतर ते पुन्हा बिहारला गेले.
images 2020 09 06T130650.598
मुंबईतील मालाड या उपनगरातील मध्यमवर्गीय कुटुंबात भास्कर कुलकर्णी यांचा  सन १९३० मध्ये जन्म झाला. त्यांच्या वडिलांची लाकडाची वखार होती. पण पिंड कलाकाराचा होता.आईकडून आध्यात्मिक तर वडिलांकडून चित्रकलेचा वारसा त्यांना मिळाला. बालपणी, तारुण्यात त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाले.पुढे ते समाजवादी विचारधारेला मानू लागले. मनात पेरलेल्या या बीजाचा पुढे त्यांना नक्कीच उपयोग झाला. बिहारमध्ये व आदिवासी पाड्यांवर भटकंती करताना ते लोकांना आपलेसे करु शकले.सर्वांमध्ये सहजपणे त्यांचेच होऊन मिसळून गेले. गंजाडला रहाताना त्यांनी वारली बोलीभाषा, त्यांचे नृत्य व तारपावादन शिकून घेतले होते. त्याआधी मुंबईतील प्रख्यात जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी कमर्शियल आर्टचे प्रशिक्षण घेतले. नंतर वीव्हर्स सर्विस सेंटरमध्ये नोकरीला लागले. तेथील कामाचा एक भाग म्हणून त्यांना बिहारला पाठविण्यात आले. जितवारपूर, दरभंगा या मधुबनी जिल्ह्यातील गावांमध्ये त्यांना काही महिला घरांच्या भिंतीवर चित्रे रेखाटताना आढळल्या.कुलकर्णींनी निरीक्षणातून त्यातले बारकावे, सूक्ष्म फरक जाणून घेतले. त्या कलेचा अभ्यास करून मधुबनी कला म्हणून ती प्रकाशात आणली. श्रीमती पुपुल जयकर यांचे ( त्यांचाही जन्म ११ सप्टेंबर १९१५ चा. दोन दिवसांपूर्वी त्यांची १०५ वी जयंती झाली. ) त्यासाठी पाठबळ मिळाले.पुढे जयकर यांनाही पद्मभूषण किताबाने गौरविण्यात आले.
     १९६४ साली बिहारमध्ये दुष्काळ पडला. तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या सांगण्यावरून कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांनी एक योजना आखली. त्यांनी भास्कर कुलकर्णी यांना बिहारमध्ये पाठवले.कुलकर्णींनी बरोबर हॅंडमेड पेपर्स, रंग, ब्रश असे कलासाहित्य नेले. तेथील महिलांकडून भिंतीवरची चित्रे कागदांवर रंगवून घेण्यात आली. त्यात रामायण,महाभारतातील प्रसंग मधुबनी शैलीत चित्रित करण्यात आले. त्या चित्रांवर दिल्ली, मुंबईतील कला रसिकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. त्यांची देशविदेशात प्रदर्शने भरविण्यात आली.विक्रीद्वारे जमलेल्या निधीतून बिहारच्या दुष्काळग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात आली. एका कलेने अनेकांना जगवले. तेव्हापासून मधुबनी कला लोकप्रिय झाली. ती थेट साड्या,स्कार्फ, वाॅलहॅंगींग यावरही विराजमान झाली.या कलेतील अखंड योगदानाबद्दल गंगादेवी, सीतादेवी, जगदंबादेवी,महासुंदरीदेवी,बऊआदेवी यांना पद्मपुरस्कार व इतर सन्मान मिळाले. भास्कर कुलकर्णी यांनी नंतर हॅंडिक्राफ्ट हॅण्डलूम एक्सपोर्ट काॅर्पोरेशनमध्ये नोकरी केली. १९८३ साली दरभंग्यातील हाॅस्पिटलमध्ये कुलकर्णी यांनी विपन्नावस्थेत अखेरचा श्वास घेतला. या कलंदर अवलियाचे तेथील गावकऱ्यांनी चक्क मंदिर उभारले.
      ७० च्या दशकात भटकंती करताना भास्कर कुलकर्णी ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात पोहोचले. महालक्ष्मी गडावरील जत्रेत रात्ररात्र वारल्यांचे तारपानृत्य चालते. ते बघण्यासाठी कुलकर्णी अनेकांना घेऊन गेले. गंजाडच्या कलंबीपाड्यावर चार आदिवासी वारली महिला व जिवा सोमा मशे यांच्याशी भेट झाली. या भेटीनंतर वारल्यांचे सारे आयुष्यच पालटले.आदिवासी कला संस्कृतीचा अनमोल खजिना त्यांनी शोधून काढला. वारली चित्रशैलीतील विषय,त्यांची मांडणी, त्यातील सौंदर्य, निर्मितीतंत्र, कलेची नजाकत जाणून घेतली.त्यातली वैशिष्ट्ये शोधून काढली. येथेही कागद,रंग देऊन भिंतीवरची चित्रे कागदांवर उतरवून घेतली. ती घेऊन वारली कलाकारांना दिल्लीला नेले.प्रगती मैदानावर भरविण्यात आलेल्या कलामेळ्यात वारली चित्रे मांडण्यात आली. तेव्हा प्रथम या कलेला वारली हे जमातीचे नाव मिळाले. नंतर वारली कलेने जगाचे लक्ष वेधून घेतले.फकीर वृत्तीचे भास्कर कुलकर्णी वारल्यांमध्येच रमले. पांढरीशुभ्र दाढी, केसांच्या जटा, खांद्यावर चामडी बॅग आणि हातात लाल रंगाची डायरी या वेषात ते तिथल्या वातावरणाशी एकरूप झाले.त्यांनी वारली कलाकारांना वेगवेगळी माध्यमे हाताळायला शिकवली. मशे परिवाराजवळ वेगळी झोपडी बांधून तेथेच राहिले. सावकाराच्या शेतात वेठबिगारी करणाऱ्या जिव्याच्या जीवनाला त्यांनी आकार दिला. वारली कलेचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचवले.त्यामुळे वारली जमातीचे सर्वत्र नाव झाले. त्यांना आत्मसन्मान मिळाला. आदिवासी कला हे आधुनिक कलेचे दुसरे टोक आहे असा त्यांचा स्वच्छ दृष्टीकोन होता. आदिवासींच्या कलावस्तूंना त्यांनी हस्तकलेचा दर्जा मिळवून दिला.
      भास्कर कुलकर्णींनी मुंबईत केकू गांधींच्या केमोल्ड आणि कुनिका या कलादालनात वारली कलेची प्रदर्शने भरवली.मोठ्या कॅनव्हासवर शेणाने सारवून त्यावर काढलेल्या वारली चित्रांचे प्रदर्शन एनसीपीए आर्ट गॅलरीत आयोजित केले. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. साऱ्या कलाजगताने तसेच कलासंग्राहक,कलासमीक्षक यांनी या कलेची दखल घेतली.१९७६ साली मशे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.पुढे वारली कलेने अवघे विश्व व्यापले. जिव्या सोमा मशे यांना विविध प्रकारचे सन्मान मिळाले. जगभर त्यांनी वारली कला पोहचवली. २०११ मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. कुलकर्णींनी कलंबीपाड्यावर पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी विहीर बांधली. त्यासाठी आपल्या प्राॅव्हिडंड फंडातले सर्व पैसे खर्च केले.पण तिला पाणी न लागल्याने ते खचले. काही मतभेदांमुळे गंजाड सोडून ते मुंबईत परतले. सदाशिव मशे म्हणतात,  भास्कर आमचा देवच होता. ते जर आमच्याकडे आलेच नाते तर आम्ही आजही वेठबिगारी करतच राहिलो असतो. त्यांच्यामुळेच वारली जमातीला, कलेला प्रतिष्ठा मिळाली. भास्कर कुलकर्णी यांचा हा कला जीवनप्रवास अद्भुत आहे. त्यांच्या स्मृतींना आदरांजली !
चिन्हांकित डायऱ्यांमधून उलगडला कलाप्रवास…
मधुबनी आणि वारली चित्रशैली प्रकाशात आणणारे भास्कर कुलकर्णी स्वतः मात्र अंधारात राहिले. १९८३ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल २० वर्षांनी अक्षर प्रकाशनातर्फे चिन्ह मासिकाचा भास्कर कुलकर्णी विशेषांक संपादक सतीश नाईक यांनी प्रकाशित केला. तेव्हा त्यांचे मोलाचे कार्य सर्वांसमोर आले. चित्रकार विश्वनाथ सोलापूरकर यांच्याकडे कुलकर्णींनी लिहिलेल्या सुमारे १०० डायऱ्या होत्या. त्यातील वारली डायरी हा भाग चिन्हमध्ये प्रसिद्ध करण्यात आला.कलेसाठी सर्वस्व उधळून लावणे म्हणजे काय ते यातून उलगडते.रुपक कथा, कविता, मुक्तछंद,हायकू,चिंतन, सर्वात,आत्मकथन, निवेदन अशा सर्वच लेखन प्रकारातून भास्कर कुलकर्णी स्वत:ला  व्यक्त करीत राहिले. जिथे शब्द अपुरे पडले तेथे बिंदू, रेषा,रंग मदतीला आले.आकार, अवकाश, रचना, मांडणी,सौंदर्य या चित्रकलेतील संबंधित घटकांच्या मूलभूत संकल्पना या डायऱ्यांमधील पानापानांत विखुरलेल्या आहेत.चित्रकला, शिल्पकला, डिझाईन, हस्तकला लोककला या संदर्भातील त्यांचे सूक्ष्म विचार वाचकांना थक्क करतात. गो.नी दांडेकर यांच्यासमवेत गडकिल्ल्यांची भटकंती त्यांनी केली होती.सायकलवरुन भारतदौरा करताना ते नाशिकला आले होते.तेव्हाची आठवण शिवाजी तुपे यांनी लिहिली आहे.
(लेखकाचा संपर्क क्रमांक ९४२२२७२७५५)
IMG 20190401 191604
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारत-चीन तणाव : सहमतीच्या पाच कलमी कार्यक्रमानंतर

Next Post

पेठ तालुक्यात स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग !

Next Post
IMG 20200913 WA0002

पेठ तालुक्यात स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग !

Comments 1

  1. Dr Swapnil Torne says:
    5 वर्षे ago

    उत्तम लेख..

    उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011