नवी दिल्ली – देशात कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील उद्योजकांमध्ये चलबिचल वाढली आहे. देशांतर्गत वेगानं लसीकरण करण्यासाठी सरकारनं कोणतीच कसर सोडू नये, असा आग्रह अनेक उद्योजकांनी केला आहे. देशाची अर्थव्यवस्था रुळावर येत असताना पुन्हा कोरोनानं डोकं वर काढल्यानं उद्योजकांना मंदीची चिंता आहे. आपल्या कर्मचार्यांना लसीकरण करण्यासाठी नियमांमध्ये शिथिलता आणावी, अशी मागणी कंपन्या सरकारकडे करत आहेत.
प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा म्हणाले की, ज्या राज्यात कोरोनाचा वेगानं फैलाव होत आहे, अशा राज्यात सर्वांसाठी कोरोना लसीकरण खुलं करावं, अशी मी पुन्हा मागणी करत आहे. युवकांमध्ये वेगानं फैलाव होत आहे. वितरण साखळीचा विस्तार केला जावा. सर्व कर्मचाऱ्यांना लस दिली जावी यासाठी कंपन्यांना परवानगी देण्यात यावी.
उद्योजक आनंद कोटक म्हणतात, महामारी आणि लसीकरणामध्ये जबरदस्त युद्ध सुरू आहे. दुसर्या लाटेला रोखणं आता खूप आवश्यक आहे. मृतांची संख्या कमी व्हावी यासाठी आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे तयार राहावं लागणार आहे. आत्मसंतुष्ट मानसिकता मोठा धोका ठरू शकते. दोन्ही उद्योजकांनी दिलेल्या इशाऱ्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. भारतीय शेअर बाजारामध्ये गेल्या दोन दिवसात १६११ अंकांनी गडगडला. कोरोना महामारीची दुसरी लाट अर्थव्यवस्था सुधारण्याच्या गतीला मंदावू शकते, या शक्यतेमुळेही युरोपीय आणि आशियाई शेअर बाजार गडगडत आहे.