राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता सारखा अनमोल ग्रंथ लिहून ग्रामविकासाचा मार्ग दाखविला. या ग्रंथातील त्यांचे विचार आजही प्रेरक आणि मार्गदर्शक आहेत. आज दि. ११ ऑक्टोबर रोजी त्यांची पुण्यतिथी त्यानिमित्त विशेष लेख….
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद लहान असतांना त्यांनी एका महापुरुषाचे भजन ऐकले होते, त्या भजनाने ते आणि त्यांच्या भगिनी भारावून गेले होते. त्यांच्या मनात या भजनाचे स्वर गुंजत होते.त्यानंतर राष्ट्रपती झाल्यावर देखील त्यांना पुन्हा या महापुरुषाचे भजन ऐकण्याची इच्छा झाली त्यानुसार त्यांनी त्या महाराजांचा दिल्ली येथे भजनाचा कार्यक्रम राष्ट्रपती भवनात ठेवला. त्यावेळी ज्येष्ठ नेते व वरिष्ठ शासकीय अधिकारी देखील उपस्थित होते. महाराजांच्या भजनाने सर्वच मंत्रमुक्त झाले. तेव्हा डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी उद्गार काढले की, आप संत नाही, राष्ट्रसंत हो! त्यानंतर हा सन्मान जनमानसात रुजला, आणि सारा समाज त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखू लागला. ते महापुरुष म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होय.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे संत ज्ञानेश्वरांपासून संत गाडगे महाराज यांच्यापर्यंत आणि त्यानंतर कितीतरी थोर विभूती होऊन गेल्या. याच परंपरेतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विदर्भातील भूमिपुत्र केवळ धर्मकार्यासाठी मागे न लागता जनसेवेचा ध्यास त्यांनी घेतला. माणूस सुधारला तर गाव सुधारला, गाव सुधारला तर देशाचा विकास होईल, ही त्यांची धारणा होती, त्याच प्रेरणेतून त्यांनी जीवनभर कार्य केले .
आधुनिक संत, कवी, समाजसुधारक माणिक बंडोजी इंगळे उर्फ तुकडोजी महाराज यांचा जन्म दि. ३० एप्रिल १९०९ रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या खेडेगावात गरीब कुटुंबात झाला त्यांचे बालपणीचे नाव माणिक होते. आईचे नाव मंजुळाबाई तर वडिलांचे नाव बंडोजी बाबा इंगळे (ठाकूर) होते. वडील शिवणकाम करत. तर आई मोलमजुरी करून कुटुंबाचा चालवत असे. त्यांना लहानपणापासूनच भजन, किर्तनाची आवड होती. त्यामुळे त्यांचे शिक्षणात मन रमेना. त्या काळात मराठीतील तिसरीपर्यंत शाळा शिकल्यानंतर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. त्याच काळात त्यांना नाथपंथी आडकोजी महाराज भेटले. गुरु आडकोजी यांना माणिक हे संत तुकाराम महाराजांचे भजन म्हणून दाखवीत असत. त्यावेळी आडकोजी महाराज म्हणाले की, किती दिवस तुका म्हणे असे म्हणशील आता तुकड्या म्हणे, असे म्हणत जा. कालांतराने त्यांना तुकडोजी महाराज हे नाव मिळाले . गुरू अडकोजी यांचा शिष्य तुकडोजी असे सांगण्यात माणिक ठाकूर यांना मोठा अभिमान वाट असे. त्यामुळेच मूळ नाव बाजूला पडून तुकडोजी हेच नाव लोकप्रिय झाले.
तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते, कारण अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. कीर्तने आणि खंजिरी भजन यांच्या माध्यमातून समाजसेवा हे त्यांचे ध्येय होते. त्यांनी गावोगावी गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केली . व्यायामाचे महत्त्व सांगण्यासाठी आदेश रचना हा ग्रंथ लिहिला. देशातील तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत , आणि ते बलोपासक असावेत म्हणजे समाजाचे आणि राष्ट्राचे संरक्षण करू शकतील , असे त्यांचे मत होते . राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जीवन कार्य प्रबोधनाचा आदर्श आहे. राष्ट्रसंतांच्या हृदयाचे होते, तेच वाणीतून व्यक्त झाले. आणि जे वाणीतून उमटले तेच त्यांच्या कृतीतून लोकशिक्षणासाठी सिद्ध झाले, असे मत अनेक संत साहित्याच्या अभ्यासक यांनी व्यक्त केले आहे.
स्वातंत्र्यलढ्यात नेत्यांबरोबरच देशप्रेम शिकवणारे काही संत, सत्पुरुष होते. त्यात कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा अग्रक्रम होता. गाडगे महाराज यांच्या कीर्तनातून समाज जागृती होत होती. तर तुकडोजी महाराजांच्या खंजिरी भजनातून देशभक्तीची चेतना स्फुरत होती . किंबहुना 1930च्या असहकार आंदोलनात आणि 1942 च्या चलेजाव चळवळीत खंजरी भजनाने मोठा रंग भरला होता. त्यांनी 1935 च्या मार्च महिन्यात महाराजांनी सालबर्डी येथे महारुद्र यज्ञ सुरु केला, पंडित हरिनारायण पालीवाल यज्ञाचे मुख्य संयोजक होते. 80 एकर जागेत सुरू झालेल्या या यज्ञात संत-महंत आपल्या अनुयायांसह उपस्थित होते. या संमेलनासाठी गाडगे महाराजांचे कीर्तन आणि तुकडोजी भजन रंगू लागले. या यज्ञाबद्दल काही जणांनी टिका केली. त्यानंतर गांधीजींच्या सूचनेवरून महाराज महात्माजींसमवेत आश्रमात रहावयास गेले. आश्रमाच्या नियमानुसार प्रार्थना, गीता पाठ, चर्चा , सूतकताईमध्ये त्यांनी सहभाग घेतला. दररोज प्रार्थना झाल्यावर ते गांधीजींना भजन म्हणून दाखवू लागले. एकदा तर गांधीजी हे महाराजांच्या भजनात इतके तल्लीन झाले की, मौन असतानाही त्यांनी, और एक भजन कहीए तुकडोजी, असे म्हटले.
फारसे शिक्षण झालेले नसताना तुकडोजी महात्माजी बरोबर अनेक विषयावर सखोल चर्चा करीत. तेव्हा आश्रमातून निरोप घेताना गांधीजींनी महाराजांना क्रांतीचे प्रतीक असलेला चरखा भेट दिला. त्या वेळी कस्तुरबा गांधी आणि सरहद्द गांधी म्हणजे खान अब्दुल गफारखान हेदेखील उपस्थित होते. तुकडोजी महाराजांचे संत गाडगेबाबा, पंतप्रधान पंडित जवाहर नेहरू, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, आचार्य विनोबा भावे, सरदार वल्लभाई पटेल, आचार्य कृपलानी, सानेगुरुजी, पंडित मालवीय, ठक्कर बाप्पा, काकासाहेब गाडगीळ, जयप्रकाश नारायण , शंकरराव किर्लोस्कर, गुलझारीलाल नंदा सोबत बंधुत्वाचे संबंध होते. यातील अनेकांनी त्यांच्या आश्रमाला भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला , तर राष्ट्र विकास होईल अशी त्यांची श्रद्धा आणि विचारसरणी होती. त्यांनी समाजातील सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी रात्रंदिवस काळजी वाहिली . ग्रामविकास हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना भरपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला. तसेच त्या कशा सोडवाव्यात याविषयी उपाययोजनाही सुचविली.
खंजिरी भजनाने तुकडोजी महाराजांनी संपूर्ण देशाला मंत्रमुग्ध केले होते. त्यामुळे त्यांच्या धर्म आणि समाजकार्याची चर्चा जगभरात होऊ लागली. या दरम्यान 1955 मध्ये जपानमध्ये विश्वधर्म परिषद आणि विश्वशांती परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उपस्थित राहिले. याठिकाणी विविध देशातून अनेक धर्म पंथाचे संत महात्म्यांनी धर्मगुरू आले होते. प्रत्येक प्रतिनिधी आपला धर्म कसा श्रेष्ठ असे ठणकावून सांगत होते. त्याचवेळी महाराजांनी फक्त एकच भजन गायले,
हर देश मे तू , हर वेश मे तू ,
तेरे नाम अनेक तू एक ही है,
त्यांच्या या भजनाला साऱ्या धर्मगुरूंनी उत्स्फूर्त दाद दिली. त्याच वेळी त्यांचे भाषण देखील सर्वांना प्रभाव पाडून गेले. त्यांनी सर्व धर्मांतील सारखाच असलेला बंधुभाव व शांती बद्दल विचार मांडले. त्यावेळी उपस्थितांपैकी 30 पैकी 18 देशांच्या प्रतिनिधींनी तुकडोजींचे सन्माननीय धर्म सल्लागार म्हणून नेमणूक केली .भारताच्या ग्रामविकासाला प्रेरणादायक आणि मार्गदर्शक ठरणारा ग्रामगीता ग्रंथ राष्ट्रसंतांनी ग्रामनाथाला अर्पण केला आहे. या ग्रंथाची 1955 मध्ये प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली. त्याचे मूळ संपादक स्व. सुदाम सावरकर होते. त्यानंतर कालांतराने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ पुणे यांनी पुणे विद्यापीठ, श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम अमरावती आणि श्री गुरुदेव आत्मअनुसंधान केंद्र, चंद्रपूर यांच्या सहकार्याने ग्रामगीता ग्रंथ प्रकाशित केला. ग्रंथाचा अनेक मान्यवरांनी गौरव केला . ग्रामगीता हा ग्रंथ महान असून त्यात खेड्यातील लोकांच्या भावनांची जोपासना करण्यात आली आहे सामान्य ग्रामाची संपूर्ण सुधारणा कशी करायची? तसेच ग्रामीण जीवनातील सर्व बाबींचा यात विचार केलेला दिसतो.
केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून टपाल तिकीट काढले आहे तर महाराष्ट्र शासनाने ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धा आयोजित केली होती. तसेच नागपूरच्या विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे नाव दिले आहे. भारताचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी 1956 च्या लोकसभेत चर्चेस उत्तर देताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला होता. तसेच तुकडोजी महाराज कर्करोगाने आजारी असताना ऑगस्ट 1968 मध्ये समाजसेवक बाबा आमटे यांनी त्यांना पत्र लिहून आनंदवनातील कुष्ठरोग्यांचा शीण तुमच्या भजनाने हलका होतो, असे म्हटले होते. तुकडोजी महाराजांचे वेगळ्या रूपाने २१०० अभंग प्रसिद्ध आहेत. त्यांचे मेरी जापान यात्रा, नेपाल यात्रा ही प्रवासवर्णने, तसेच भाषणे आदि लेखन प्रसिद्ध आहे .
महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांनी शंभर गावे दत्तक घेऊन महात्माजींना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली. ग्राम विकासाबरोबर स्वातंत्र्यचळवळ, स्त्री-स्वातंत्र्य, तरुणांचे प्रबोधन या क्षेत्रात मोलाचे योगदान त्यांनी दिले . अनेक संमेलने, शिबिरे यात त्यांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन केले . आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना कर्करोगाने ग्रासले. मुंबई येथील रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र अखेर मोझरी येथे अश्विन वद्य पंचमीला दि. ११ ऑक्टोबर १९६८ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सारे राष्ट्र हेलावले.
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)