मुंबई – राज्यात कालपासून बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरासह तालुक्यातल्या मुठाड, इब्राहीपूर, तांदुळवाडी, नांजा, क्षीरसागर, मासनपूर, जोमाळा, मालखेडा, सुभानपूर या भागात आज दुपारी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह गारपीट झाली. पाऊणतास झालेल्या पावसात काही वेळ बोराच्या आकाराच्या गारा पडल्या. या गारपीटीमुळे गहू, हरभरा, कांदा बियाणे या पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, सिन्नर कळवणसह काही भागात आज दुपारी पावसानं हजेरी लावली, तर सटाणा इथल्या अंतापूर परिसरात गाराही पडल्या. ढगाळ वातावरण आणि त्यानंतर झालेल्या बेमोसमी पावसामुळे नाशिक जिल्ह्याच्या बहुतांश भागातले द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत.नाशिक शहरातही पावसाचा शिडकावा झाला. भंडारा जिल्ह्याच्या काही भागात आज दुपारी 4 च्या सुमाराला माध्यम स्वरूपाच्या गारांसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे गहू, हरभरा, वाटाणा, तूर आणि इत्यादी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

बुलडाणा जिल्हयात आज सकाळी पावसानं बुलडाणा, चिखली परिसरासह जिल्ह्याच्या काही भागात चांगलीच हजेरी लावली. बुलडाणा तालुक्यात तांदुळवाडी इथं अंगावर वीज कोसळून एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर चिखली तालुक्याथत वीज कोसळून हरभरा पिकाची सुडी जळाली.चंद्रपूर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमधे आज सकाळी जोरदार वाऱ्यासह हलक्या सरीचा पाऊस पडला आहेत. त्यामुळे दिवसभर वातावरणात गारवा जाणवत होता. या आवकाळी पावसामुळे रब्बी पीकांना धोका निर्माण झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या विविध भागात आज सलग दुसऱ्या दिवशी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. माण, खटाव, खंडाळा, वाई, कोरेगाव, सातारा तसंच इतर काही ठिकाणी गारपीटीसह मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. या पावसानं शेतात उभी असणारी मका,गहू, ज्वारी ही पिकं आडवी झाली. तर, गारपीटीनं द्राक्ष आणि आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.
रायगड जिल्ह्यात महाड, माणगाव, गोरेगाव परिसरात आज अचानक आलेल्या अवकाळी पावसानं लोकांची धावपळ उडवली. जिल्ह्यात आभाळ भरून आलं असून सर्वत्र वातावरणात गारवा आहे. या पावसामुळे आंबा पिकाला फटका बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे नांदेड जिल्ह्याच्या नायगांव तालुक्यात सूजलेगाव शिवारात हरभरा पिकांची काढणी करीत असलेल्या शेतमजुराचा आज दुपारी अंगावर वीज पडून मृत्यू झाला,. तर त्याच्या सोबत काढणीच काम करीत असलेल्या पाच महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना नायगांवच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अवकाळी पावसान हजेरी लावली. वैभववाडी आणि कणकवली तालुक्यात पाऊस पडला. वैभववाडी तालुक्यात खांबाळे गावाला वादळाचा तडाखा बसला. त्यामुळे फोंडा-वैभववाडी मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. ग्रामस्थांनी रस्त्यावरची झाडं हटवत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. वादळामुळे अनेक घरांच्या छप्परांचं नुकसान झालं. या अवकाळी पावसामुळे आंबा-काजुच मोठ नुकसान झालं असून शेतकरी अडचणीत आले आहेत.