मुंबई : रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या असा गंभीर आरोप कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ते म्हणाले की, शुक्ला भाजपसाठी काम करत होत्या. त्यांनी अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावर यांच्यावर दबाव टाकला होता. मी स्वतः राजेंद्र येड्रावरकरांशी यांच्याशी बोललो. त्यांनी मला सगळी परिस्थिती सांगितली असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधकांकडून सातत्याने केल्या जाणा-या राष्ट्रपती राजवटीच्या मागणीचाही समाचार घेतला. ते म्हणाले की, त्यात काही नवे नाही. आम्ही शपथ घेतल्यानंतर ३६ तासातच ते ही मागणी करत होते.
शुक्लाच्या पत्राबाबत बोलतांना ते म्हणाले की, रश्मी शुक्ला यांनी रडून माझ्या पतीचं आताच निधन झालय असे म्हणून माफी मागितली होती. मग आमच्या सरकारला पाझर फुटला. रश्मी शुक्ला यांनी माफी मागितली आणि त्यांनी दिलेलं लेखी पत्र परत मागितले. बरं झाले सरकारने ते पत्र परत नाही दिले. आता कळतंय हा कटाचा भाग होता.
महाविकास आघाडी सरकार विरोधात गंभीर आरोप होत असतांना कालपासून आव्हाडही आक्रमक झाले. त्यांनी भाजपने केलेले आरोप खोडून काढत गेल्या दोन दिवसात पत्रकारांशी संवाद साधला.