नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मार्चपासून दोन दिवसांच्या बांगलादेशच्या दौऱ्यावर जात आहेत. हा दौरा अनेक बाबींनी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दोन्ही देशांदरम्यान कूटनीतिक सांसस्कृतिक संबंध वाढवण्याच्या दृष्टीनं या दौऱ्याकडे पाहिलं जात आहे. कोरोनाचे संकट सुरु झाल्याने पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे बंद होते. या दौऱ्याद्वारे ते प्रथमच परदेशात जात आहेत.
२६ मार्चला बांगलादेशच्या राष्ट्रीय दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऑनलाइन बैठक झाली होती.
परस्पर सहमती पत्रावर स्वाक्षरी
२६ मार्चला बंगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबूर रेहमान यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी होतील. बांगलादेशाच्या मुक्ती संग्रामाला तसंच दोन्ही देशांच्या कूटनीतिक संबंधांना ५० वर्ष पूर्ण होत आहेत. बांगलादेश दौऱ्यादरम्यान मोदी शेख हसिना यांच्या चर्चा करतील. परस्पर सहमतीपत्रावर दोन्ही देशांचे प्रमुख स्वाक्षरीसुद्धा करतील.
सुरक्षेसंदर्भात काळजी नसावी
बांगलादेशमधील काही डाव्या आणि काही कट्टरपंथी मुस्लिम संघटना मोदी यांच्या दौर्याला विरोध करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसंदर्भात कोणताच धोका नाही, असं बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. ए के अब्दूल मेमन म्हणाले, मोदी यांना बांगलादेशमध्ये आमंत्रित करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. लोक आमच्यासोबत आहेत. काही लोक विरोध करत आहेत. त्यांना विरोध करू द्यावा. काळजीचं कोणतंच कारण नाही.
नैसर्गिक संकट व्यवस्थापन आणि सहकार्यावर करार
पंतप्रधान मोदी यांच्या दौर्यादरम्यान माहिती देताना परराष्ट्र व्यवहार मंत्री मेमन म्हणाले, की दोन्ही देशांदरम्यान तीन करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. परंतु या करारांना अंतिम रूप देण्यात आलेलं नाही. बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मसूद बिन मोमेन म्हणाले, देशांदरम्यान नैसर्गिक संटक व्यवस्थापन आणि सहकार्य क्षेत्रात करार होऊ शकतात. या करारांवर काम सुरू असून, येत्या दोन-तीन दिवसांत त्यांना अंतिम स्वरूप दिलं जाईल.