मालेगाव – शेतकरी विरोधी कृषी कायद्यांच्या विरोधात मागील सहा महिन्यांपासून संपूर्ण भारतातील शेतकरी दिल्ली येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. त्याच पार्श्वभुमीवर शुक्रवारी (दि.२६) भारत बंद ची हाक त्या आंदोलनाचा पुढचा टप्पा आहे. या शेतकरी आंदोलनाला मालेगाव राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देत अपर जिल्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
सदरील कायदे करण्यासाठी संपूर्ण लोकशाही मूल्ये, परंपरा पायदळी तुडवून देशातील विरोधी पक्षाला व शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हे शेतकरी विरोधी कायदे मंजूर करण्यात आले. या विरोधात संपूर्ण भारतातील शेतकरी दिल्ली येथे बसून आंदोलन करीत आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही, पाकिस्तानी समर्थक म्हणून संभावना करण्यात येत आहे. त्यांच्यावर पाण्याचे फवारे, अश्रूधुराचा वापर, त्यांच्या मार्गात खिळे ठोकून त्यांना जेरबंद केले जात आहे. याच पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनाला अजून गती दिली आहे. २६ मार्च भारत बंद ची हाक त्या आंदोलनाचाच पुढचा टप्पा आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला असून पंतप्रधान नरेंद मोदी यांनी शेतकरी विरोधी कायदे रद्द करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या प्रसंगी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मालेगाव महानगर अध्यक्ष दिनेश ठाकरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र ठाकरे, सतीश पगार, केवळ हिरे, सागर पाटील, विजय जगताप, भूपाल भोसले, संदीप ठाकरे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.