मालेगाव – येथील महानगर पालिकेच्या आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रामाणिक आयएएस अधिकारी नियुक्त करावा. तसेच मालेगाव महानगर पालिकेवर रिक्त शासन प्रतिनियुक्तीची अपर आयुक्त, शहर अभियंता, आरोग्य अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, लेखाधिकारी व इतर पदे तात्काळ भरण्याची मागणी देखील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने राज्यपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भातील निवेदन राज्यपाल यांना अपर जिल्हाधिकारी मार्फत नायब तहसीलदार सायंकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच मालेगाव महानगर पालिकेच्या आयुक्तपदी असलेले त्र्यंबक कासार यांच्यावर २५ मार्च २०२१ च्या महासभेत अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. महापालिकेच्या महासभेत अनेक भ्रष्ट्राचाराचे गंभीर आरोप अविश्वास प्रस्तावाची चर्चा करताना प्रशासनावर लोकप्रतीनिधींनी केलेत. मनपा आयुक्त यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन महासभा, स्थायी समिती व लोकप्रिनिधींकडून विविध ठराव करून कसा भ्रष्ट्राचार सुरू आहे याबाबत माहिती दिली. मालेगाव महानगर पालिकेच्या आयुक्तांवर इतिहासात पहिल्यांदा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्तपद रिक्त होत आहे. तसेच शहर हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची पदे शासनातर्फे रिक्त ठेवण्यात आली आहेत. त्याचा मोठा परिणाम शहराच्या विकासावर होत आहे. त्यामुळे शासानालाच मालेगाव शहराचा विकास व्हावा असे वाटत नाही अशी धारणा समितीचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मालेगाव महानगर पालिका दि १७ डिसेंबर २००० रोजी निर्माण होऊन आता २१ वर्ष होत आहेत. परंतु मालेगाव शहराचा म्हणावा तसा विकास होऊ शकला नाही. प्रशासकीय कामकाजात सुधारणा घडवून आणण्यात आतापर्यंतचे मुख्याधिकारी संवर्गातील आयुक्त सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे “महानगर पालिकेच्या पेक्षा आपली नगरपालिका बरी होती” असे म्हणण्याची वेळ मालेगाव वासीयांवर आली आहे. मालेगाव शहराची लोकसंख्या जवळ जवळ ८-१० लाखाच्या घरात गेली आहे. मालेगाव महानगर पालिकेची हद्दवाढ होऊन १० वर्षाचा कालावधी लोटला आहे. परंतु अजूनही हद्दवाढ झालेल्या सोयगाव, भायगाव, द्याने-रमजानपूरा, म्हाळदे, दरेगाव, सायने भागात पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. शहरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही. स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून औषध फवारणी नियमित केली जात नाही. प्रशासकीय कामकाज दिवसेंदिवस ढेपाळत चालले असून कामकाजात अनियमितता व भ्रष्टाचार वाढत चालला आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात समन्वय आढळत नाही. नियमबाह्य व गुणवत्ताहीन कामे मार्गी लावली जातात. एकाच कनिष्ठ अधिकाऱ्याकडे अनेक वरिष्ठ पदांचा प्रभारी पदभार दिला जातो. त्यामुळे मनमानी कारभार, हेवेदावे, फाईल पेंडंन्सी वाढली आहे.
मालेगाव महानगरात सध्या वाढता कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक ठोस पावले व कठोर निर्णय घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या सक्षम करण्यासाठी, पुरेशा आरोग्य सुविधा निर्माण करत भविष्यात साथरोग प्रतिबंध व नियंत्रण करणे सोपे व्हावे यासाठी तसेच अमृत योजने अंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे ते निर्धारित वेळेत पूर्ण करणे, भारत स्वच्छता अभियान मध्ये स्वच्छता विषयक कामांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. त्याचा योग्य व परिणामकारक विनियोग करणे. म्हाळदे व सायने येथील घरकुल योजना पूर्ण करून त्याठिकाणी नागरिकांना स्थलांतरित करून झोपडपट्टी निर्मूलन करत लोकसंख्येची घनता कमी करण्यासाठी मोसम नदी स्वच्छता व सुधार आराखडा राबविणे, मुख्य रस्त्यावर हॉकर्स झोन निच्छित करणे, फाईल पेंडन्सी कमी करून प्रशासकीय कामकाजात पारदर्शक गती आणून धोरणात्मक निर्णय घेणे, आर्थिक शिस्त लावणे, भ्रष्ट्राचाराला अंकुश आणून गुणवत्तापूर्ण नियोजन बद्ध विकासकामे मार्गी लावणे, निधीचा योग्य विनियोग करणे, लोकप्रतिनिधी नागरिक यांच्याशी समन्वय साधून काठोर निर्णय घेणारा भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस अधिकारी मालेगाव महानगर पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त होणे आवश्यक आहे.
११ नोव्हेंबर २०११ नुसार ड वर्ग महानगर पालिकेच्या अवर सचिव दर्जाचे अपर आयुक्त नियुक्त करण्याचा निर्णय झाला असून त्यानुसार प्रशासकीय कामकाजात गती यावी म्हणून मालेगाव महानगर पालिकेच्या अपर आयुक्तपदी अवर सचिव दर्जाचा अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे. तसेच शहर अभियंता, आरोग्य अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, लेखाधिकारी, नगर सचिव, मुख्य अग्निशमन अधिकारी ही पदे शासन प्रतिनियुक्तीची आहेत. या रिक्त पदांवर तात्काळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात याव्यात आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. त्यांची एक एक प्रत मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे, कृषी मंत्री, दादाजी भुसे, मुख्य सचिव, नगर विकास सचिव यांना पाठविण्यात आली यावेळी आम्ही मालेगावकर समितीचे निखिल पवार, राजाराम पाटील, राजेंद्र पाटील, ॲड. अतुल महाजन, सुशांत कुलकर्णी, गणेश जंगम, कपिल डांगचे, अनिल पाटील, आप्पजी महाले, रोशन गांगुर्डे, सुशील शेवाळे, रिजवान शेख आदी उपस्थित होते.