गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
पिंपळगाव बसवंत: आघाडी सरकार बरखास्त झालंच पाहिजे, सक्तीची वीज बिल वसुली थांबलीच पाहिजे,गृह मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आदी घोषणाबाजी करत महावितरणने सक्तीची वीज वसूली थांबवावीव राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यावा या मागणीसाठी पिंपळगाव बसवंत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील निफाड फाटा परिसरात आंदोलन छेडत येथील महावीतरणचे उपकार्यकारी अभियंता एकनाथ कापसे यांच्यासह पिंपळगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक कुणाल सपकाळे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासून घरगुती व शेतकरी वीज बिल वसुलीच्या नावाखाली शेतकरी बांधवांचे वीज कनेक्शन खंडित करण्याचे धाडसत्र सुरू केले आहे. आधीच कोरोना सारखी महामारी त्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याने महावितरण कार्यालयाने सक्तीची वसुली तातडीने थांबवावी शिवाय मनसुख हिरेन प्रकरणासह १००कोटींची खंडणी वसूली प्रकरण राज्याला काळिमा फासणारे असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा देण्याची मागणी शहर भाजपतर्फे निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन प्रसंगी भाजपचे जिल्हा चिटणीस सतीश मोरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत घोडके, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश चिटणीस अल्पेश पारख, तालुका सरचिटणीस नंदलाल नावंदर, शहर अध्यक्ष गोविंद कुशारे, दत्तात्रय काळे, अशोक मोरे, रमेश कदम, संदीप झुटे, जय रावल, राहुल सोनवणे,चेतन मोरे, आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
तुम्हीच द्राक्ष विका, अन वीजबिलेही भरा
सध्या कोरोनामहामारीसह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह द्राक्ष उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात शेतकऱ्यांना आलेली अवाजवी बिले भरायची कुठून असा संतप्त सवाल भाजपा पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करत महावितरण कार्यालयाने शेतकऱ्यांच्या भोवती धाडसत्र सुरू केल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी उत्पादकांचे द्राक्ष तुम्हीच विका अन विजबिले तुम्हीच भरा . तेव्हा कुठे शेतकऱ्यांच्या भावना तुमच्या लक्षात येतील, अन त्या शासनापर्यंत जातील.