पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील जनतेला मुंबई – आग्रा महामार्गाने पिंपळगाव बसवंत येथून नाशिकला दैनंदिन, शैक्षणिक, प्रशासकीय, शेती विषयक, रोजगार आदी कामांसाठी स्वत:च्या वाहनाने यावे – जावे लागते. त्यातच नुकताच संबधित कंपनीकडून १ एप्रिल २०२१ पासून पथकार वाढविण्याचा प्रस्ताव जाहीर करण्यात आला आहे. सध्या पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला गवसणी घालत असताना आपल्या कंपनीकडून केलेली टोल दरवाढ रद्द करावी, अशी मागणी देवेंद्र काजळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
व्यवस्थापक नवनाथ केदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीएनजी टोल-वे कंपनीने केलेली प्रस्तावित टोल दरवाढ रद्द करावी, नव्याने वाहन खरेदीच्या वेळी वाहनधारकांकडून एकरकमी १५ वर्षाकरीता रस्ते कर म्हणून रक्कम स्विकारली जाते. असे असतांनाही टोल वसुली होते, ती रद्द करावी, सदर कंपनीकडून प्रस्तावित १ एप्रिल २०२१ मध्ये होत असलेली टोल दरवाढ वाहनधारकांना अन्यायकारक आहे. ती तत्काळ रद्द करावी, कंपनीच्या पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य, विकास सेवा संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक तसेच वर्तमानपत्राचे, वृत्त वाहिन्यांचे पत्रकार आदींना त्यांच्या कार्डवर टोलमधून वगळण्यात यावे, तसेच महामार्गावरील अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करावीत. तसेच महामार्गावरील साईडपट्यांच्या बाजूला असलेली काटेरी झाडे त्वरीत काढावीत व डिव्हाइडरच्या आजुबाजुला असलेली माती, वाळूदेखील काढून महामार्ग स्वच्छ ठेवावा, जेणेकरुन धुळीचे प्रमाण कमी होईल, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मनोज मोरे, अमोल ताकाटे, लक्ष्मण वलवे, भारत साबळे, आदी उपस्थित होते.
या आहेत मागण्या
– कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांना सन्मानाची वागणूक मिळावी.
– आतापर्यंत मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील रस्ता कामासाठी झालेला खर्च तपशील व टोल वसुलीतून झालेल्या दैनंदिन खर्चाचा तपशील हा पूर्णपणे डिजीटल बोर्डच्या माध्यमातून सर्वांना दिसेल अशा प्रकारे आपल्या टोल नाक्यावर लावावा.
– रुग्णवाहिका सेवा तातडीने मिळावी.
– छोट्या क्रेनची व्यवस्था करावी.
– उंबरखेड चौफुलीवरील पथदिप सुरू ठेवावेत.
– स्थानिकांची वाहने पूर्वीप्रमाणेच टोलमुक्त ठेवावीत.
– एक लाईन फास्टॅग नसलेल्या वाहनांना सुरू ठेवावी.