नवी दिल्ली ः देशातील ५ राज्यांमध्ये निवडणूक जाहिर झाली असली तरी एकट्या पश्चिम बंगालमध्येच तब्बल ८ टप्प्यात मतदान होणार आहे. अन्य राज्यात मात्र एका दिवशीच मतदान आहे. हा असा भेदभाव का, या प्रश्नावरुन विरोधकांनी भाजपचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. त्यामुळेच निवडणूक जाहिर होताच बंगालमधील वातावरण तापले आहे.
तृणमूल काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहे. तर भाजपनं निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. इतर राज्यांमध्ये कमी टप्प्यात मतदानाची प्रक्रिया घेत असताना पश्चिम बंगालमध्ये अनेक टप्प्यात मतदान का घेतले जात आहे, असा सवाल तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तर मतदान प्रक्रिया शांततेत होण्यासाठी असामाजिक तत्वांना नियंत्रित करण्याची गरज असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.
ममता बॅनर्जींचा आरोप
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली आहे. इतर राज्यात एका टप्प्यात मतदान होत आहे. मात्र बंगालमध्ये अनेक टप्प्यात मतदान का घेतलं जाणार आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोग लोकांना न्याय देणार नाही, तर लोक कुठे जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सल्ल्यानंतरच निवडणुकांची तारीख घोषित करण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला.










