दिंडोरी : कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात दिंडोरी व पेठ तालुक्यात प्रशासनाने अत्यंत चांगले काम करत कोरोनाचा प्रार्दुभाव कमी ठेवण्यात मोठी भूमिका बजावली त्याचप्रमाणे आताही सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवत कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.
दिंडोरी व पेठ तालुक्यातील आरोग्य विभागाचा तसेच वाढती कोरोणा रुग्णसंख्या याबाबत शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत दिंडोरी येथील पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विधानसभेचे झिरवाळ यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांच्याकडून दिंडोरी व पेठ या दोन्ही तालुक्यातील आरोग्य विभागाचा आढावा घेतला,व समस्या जाणून घेतल्या.त्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच शासनस्तरावरील पूर्तता त्वरित पूर्ण करत कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाही, प्रत्येक रुग्णाला चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात यावी,वणी बोपैगाव यैथील कोविड सेंटरवर होणारी गर्दी लक्षात घेता येथील बेड वाढविणे, ऑक्सिजन बेड वाढविण्याबाबत कार्यवाही केली जाईल. दिंडोरी येथेही कोविड सेंटर उभारण्याचा विचारविनिमय सुरू आहे. तसेच काही खाजगी डॉक्टर कोव्हिडं उपचारासाठी पुढे येत आहे. त्यांना परवानगी दिली जाईल असे झिरवाळ यांनी सांगितले.
प्रशासकीय अधिकारी रुग्ण संख्या कमी व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत जनतेनेही त्यांना सहकार्य करावे विनाकारण घराबाहेर पडू नये मास्कचा वापर करावा असे आवाहनही झिरवाळ यांनी यावेळी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ संदीप आहेर यांनी विविध सूचना मांडत कार्यवाही बाबत माहिती दिली. सर्व विभागाने तत्परतेने काम करत कोरोना विरुद्धची लढाई जिकण्यास योगदान द्यावे असे आवाहन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत खैरे, जिप सदस्य भास्कर भगरे,दिंडोरीचे उपनगराध्यक्ष कैलास मवाळ,पेठचे पोलीस उपअधीक्षक भिमाशंकर ढोले,कळवणचे पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले, दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार पेठचे तहसीलदार संदीप भोसले तालुका आरोग्य अधिकारी डॉ सूचित कोशिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ विलास पाटील, पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण,स्वप्निल राजपूत रामेश्वर गाडे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
ग्रामसेवक तलाठी यांनी मुख्यालयी थांबावे
सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे कार्यरत मुख्यालयी राहणे अत्यावश्यक असून ग्रामसेवक तलाठी यांच्याबाबत मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी आहे. तरी यापुढे कुणाचीही अशी तक्रार येणार नाही. याची दक्षता घेत वरिष्ठांनी त्याबाबत संबंधितांना आदेश देत मुख्यालयी राहण्याबाबत सांगावे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या असे आवाहन विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची जिओग्राफीक हजेरी घेतली जाईल असे सूतोवाच केले.