नाशिक – अलीकडेच पदभार स्वीकारलेल्या नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलिस प्रभारी अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रात अट्टल दहा गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्वांवर या पुढील काळात कडक कारवाई होण्याची चिन्हे आहेत.
या संदर्भात माहिती देताना पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याकरिता अट्टल गुुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे हे आमचे लक्ष्य आहे, जेणेकरून ते गुन्हेगारीचा अवलंब करण्यापासून परावृत्त होतील आणि समाजात संकट निर्माण करणार नाहीत. खून, मारामारी व मालमत्तेच्या गुन्ह्यात गुंतलेले गुन्हेगार आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमुळे समाजात अनेकदा धोका निर्माण होतो, म्हणूनच अशा घटकांवर नजर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक होते. याकरिता जिल्हा पातळीवर एक यादी तयार केली जाईल.
जिल्ह्यातील स्थलांतर आणि त्याचा व्यापक प्रसार पाहता चोरी, घरफोडी, महामार्ग चोरी, साखळी लुटणे इत्यादी ग्रामीण भागात सामान्य आहेत. आदिवासी, औद्योगिक व कृषी पट्ट्यांमध्ये तसेच मालेगावच्या वस्त्रोद्योगातही गुन्हेगारीचे प्रकार भिन्न आहेत, असे स्पष्ट करून त्यांनी सांगितले की, संपूर्ण ग्रामीण जिल्ह्यात महामार्गावर लुटमारीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. तसेच गेल्या काही महिन्यात सशस्त्र दरोडे आणि हत्याच्या घटनांमुळे संपूर्ण ग्रामीण जिल्हा हादरला आहे. ऑगस्टमध्ये एका महिलेसह तिच्या कुटुंबातील चार सदस्यांना अज्ञात व्यक्तीने ठार मारले. ही घटना नांदगाव तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू आहे.