पाटणा (बिहार) – चारा घोटाळा प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे मुख्य नेते लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर झाला आहे. झारखंड हायकोर्टाने जामीन मंजूर केला असला तरी लालूप्रसाद यादव हे जेलमध्येच राहणार आहेत.
चारा घोटाळा प्रकरणी चाईबासा ट्रेजरी प्रकरणात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे मुख्य नेते लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र असे असले तरी दुमका कोषागार प्रकरणात देखील त्यांच्यावर आरोप असल्याने त्यांना जेलमध्येच रहावे लागणार आहे. लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळा प्रकरणात तीन वेगवेगळ्या गुन्हांमध्ये आरोपी आहेत. या प्रकरणी त्यांना १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
२३ डिसेंबर २०१७ पासून झारखंड येथील राजेन्द्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) मध्ये भरती आहेत. काही महिन्यांपूर्वी कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी त्यांना रिम्स संचालकांच्या बंगल्यात हलवण्यात आले असल्याची माहिती आहे. सप्टेंबर २०१३मध्ये चारा घोटाळा प्रकरणी दोषी आढळल्यावर लालू प्रसाद यादव यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०१४ मध्ये प्रथम ते जामिनावर बाहेर आले होते. मात्र २३ डिसेंबर २०१७ रोजी चारा घोटाळ्याशी संबंधित आणखी एका प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांना बिरसा मुंडा जेलमध्ये पाठवण्यात आले होते. सध्या न्यायालयीन कोठडी अंतर्गत त्यांच्यावर रिम्समध्ये उपचार सुरु आहेत.