जगातील कोरोना महामारीत कोरोना रोगाच्या साथीवर अलोपॅथिक, आयुर्वेदिक, युनानी आदी उपचारासाठी घरोघरी डॉक्टर, वैद्य यांचा सुळसुळाट झाल्याचा प्रत्यय सोशल मीडियावर पाहायला, वाचायला आणि ऐकायला मिळत आहे. माहितीचा महापूर आला आहे असं वाटायला लागलंय.
नाकात लिंबूचा रस टाका, मिरी, सुंठ, दालचिनी, लावंगचा काढा तयार करून सकाळ संध्याकाळ घ्या, अर्सेनिक अल्बम च्या होमिओपॅथीच्या गोळ्या दिवसातून दोनदा घ्या, सकाळ-संध्याकाळ ध्यानधारणा करा, शारीरिक व्यायाम करा, गरम पाणी द्यावे, त्याच्या गुळण्या करा येथपासून तर डॉक्टरकडे जाऊन वेळेत उपचार सुरू करा असे एक ना अनेक सल्ले दिवसभर सोशल मीडियावर फिरत असतात. त्याचबरोबर कट्ट्यावर, प्रवासात, घरा-दारात, कार्यालयात, कोरोनाशिवाय दूसरी चर्चा नाही.
वस्तुतः कोविड १९ पहिला रुग्ण सापडून उणेपुरे नऊ महिने लोटले तरी त्यावर खात्रीचा उपचार अद्याप कोणत्याही चिकीत्सा पद्धतीने शोधलेला नाही किंवा त्यावर लस तयार झाली नाही. ती केव्हा होईल असे खात्रीपूर्वक कोणीही सांगू शकत नाही.
मुळात कोरोनाचा विषाणू नवीनच आहे, त्यावर उपचार पद्धती, औषध असण्याचे कारणच नाही. तसेच वैद्यकीय क्षेत्रात माहिती नाही. त्यामुळे कोणाला दोष देणे योग्य नाही. तरीदेखील सर्व जण हे करा, ते करु नका येथपासून तर असच करा असा फुकटच्या सल्लाचे मात्र अमाप पीक सर्वत्र आले आहे.
कोरोना रोगापेक्षा कोरोनाच्या भीतीनेच पन्नास टक्के मृत्यू झाले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आपल्या एका सल्ल्याने एखाद्याचा जीव जाऊ शकतो, एखादे कुटुंब उध्वस्त होऊ शकते, याचे भान ठेवण्याची जबाबदारी स्विकारली पाहिजे.
– विजय पवार
(निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी) मोबाईल नंबर 9822114955