मुंबई – देशात दररोज कुठल्या ना कुठल्या उत्पादनांची भाववाढ होत आहे. अशात मध्यमवर्गियांना रोख भरून कार खरेदी करणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे बहुतांश लोकांची पसंती कर्जावर वाहन खरेदी करण्यालाच असते. भलेही कर्जाच्या हफ्त्यांनी माणूस त्रस्त असतो, पण तो कर्जाचाच मार्ग निवडतो. या सोबत दर वर्षी कारचा विमा उतरविणेही अनिवार्य असते. विम्यापोटीही दर वर्षी ३० ते ४० हजार किंवा त्याहीपेक्षा जास्त रक्कम भरावी लागते. तर काही लोक विम्याच्या नावावर फसवणुकही करतात. त्यामुळे कारचा विमा काढण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात घेणे आवश्यक आहे.
तुलना करा – मार्केटमध्ये विमा काढून देणाऱ्या अनेक कंपन्या आज उतरल्या आहेत. मात्र एका स्मार्ट ग्राहकाप्रमाणे आपण सर्व कंपन्यांच्या दरांची तुलना करणे आवश्यक आहे. सर्व कंपन्यांना त्यांच्या विम्याचे कोटेशन्स मागा. बरेचदा डिलर तुम्हाला महागड्या विम्याची माहिती देतात. बरेचदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आमिषे या कंपन्या देत असतात. आमच्याकडून विमा काढाल तर क्लेमसाठी धावपळ करण्याची गरज पडणार नाही, असेही या कंपन्या सांगतात.










