नवी दिल्ली, मुंबई – भारतात कोरोनाचे संक्रमण अत्यंत वेगाने वाढत आहे. कोरोनाची ही दुसरी लाट प्रत्येक भारतीयावर आक्रमण करेल, अशी शंका व्यक्त होत आहे. गुरुवारी तर तब्बल ५९ हजार नवे रुग्ण भारतात आढळले आहेत. १७ ऑक्टोबर नंतरची ही सर्वांत मोठी संख्या आहे. मुख्य म्हणजे एप्रिल महिन्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची भिती आता व्यक्त होत आहे.
दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयंकर असणार आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. विशेषतः लसीकरण सुरू झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्यामुळे दुसऱ्या लाटेचे आक्राळ विक्राळ रुप बघायला मिळत आहे. त्यातही महाराष्ट्र आणि गुजरात तर पहिल्या लाटेतील आकड्यांच्या पलीकडे गेले आहेत. तर पंजाब आता लवकरच पहिल्या लाटेपेक्षा जास्त रुग्णांची नोंद करणार आहे.
२५ मार्चपर्यंत भारतात दररोज सरासरी ४७ हजार ४४२ रुग्ण आढळले. गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतर दिवसाला एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. केवळ सात दिवसांत दररोज सरासरी २८ हजार ५५१ रुग्ण आढळत आहेत.
आठवड्याचे प्रमाण ६६ टक्क्यांनी वाढले आहे. १० मे २०२० नंतर कोरोनाच्या संक्रमणातील ही विक्रमी वाढ असल्याचे बोलले जात आहे. गेल्यावर्षी मेमध्ये दररोज सरासरी ३ हजार ५०० रुग्ण आढळत होते. आता ही संख्या वाढून ४७ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. याचाच अर्थ दुसऱ्या लाटेतील संक्रमण पहिल्याच्या तुलनेत अत्यंत वेगाने होत आहे.
एप्रिल धोकादायक
स्टेट बँक आफ इंडियाने (एसबीआय) गुरुवारी सरकारकडे सादर केलेल्या एका अहवालात एप्रिलमध्ये कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक गाठणार असल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. एवढेच नाही तर १५ फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा खेळ १०० दिवस भारतीयांना त्रस्त करणार आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.