नाशिक – शालेय शिक्षण विभागाच्या वतीने माध्यमिक शाळेतील पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळेच्या जोडण्यात निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचण निर्माण होणार असल्याने पाचवीचे प्राथमिक वर्ग शाळेच्या जोडू नये, अशी मागणी शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार केंद्र सरकारने पाचवी पर्यंतचे शिक्षण एकाच ठिकाणी घरापासून जवळच मिळावे, या उद्देशाने माध्यमिक शाळेतील पाचवीचा वर्ग प्राथमिक शाळेच्या जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्गाच्या शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय सरकारने नुकताच जाहीर केला. या जिल्ह्यातील शिक्षकांनी विरोध दर्शविला आहे. या संबंधी जिल्हा मुख्याध्यापक संघ ,पीडीएफ ,माध्यमिक शिक्षक संघ आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करताना होणाऱ्या तांत्रिक अडचणींची माहिती माहिती जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत यांनी दिली. शासनाच्या या निर्णयामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होऊन शाळांचे नुकसान होणार आहे. तसेच मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा, परिचर, शिपाई अशी पदे देखील अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. त्याशिवाय या शाळेचे वर्ग जोडले जातील त्या शाळांतील विद्यार्थी संख्या वाढून तेथील सोयी सुविधांवर देखील त्यामुळे ताण पडेल. त्यामुळे याबाबत निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी टीडीएफ संघटनेचे उपाध्यक्ष मोहन चकोर यांनी केली आहे. यावेळी सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.