लाखो लोकांच्या कानात आणि मनातही कायमचे घर करून राहिलेल्या गायिका आशा भोसले याना गेल्या आठवड्यात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला तेव्हा त्या बातमीवरील ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया फेसबुकवर वाचायला मिळाली. तीच आशाताईंच्या लाखो चाहत्यांच्या मनातलीही भावना होती.
कोणताही पुरस्कार त्या विजेत्याला पाठीवरची थाप देतो, त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात आणखी भरभरून काम करायची ताकद आणि प्रेरणा देतो, हे खरे असले तरी भारतरत्न, अन्य पद्मा पुरस्कार असोत, राष्ट्रीय स्तरावरचे अन्य पुरस्कार असोत किंवा ‘महाराष्ट्र भूषण’सारखे राज्य पातळीवरचे पुरस्कार असोत, हे पुरस्कार म्हणजे त्या व्यक्तीच्या कारकीर्दीला दिलेली पावती असते. तीही कारकीर्दीच्या शेवटी मिळालेली. परंतु तो पुरस्कार वेळेवर मिळाला तर त्याचा गोडवा अधिक असतो. आशाताईना सरकारचे ‘महाराष्ट्र भूषण’ मिळाल्याबद्दल माझ्यासारख्या लाखो सामान्य रसिकांना कमालीचा आनंद झाला आहे यात वादच नाही, परंतु, आशाताईना हा पुरस्कार खूप आधी मिळायला हवा होता यात वाद नसावा.
‘महाराष्ट्र टाइम्स’ने आशाताईना २०१७मध्येच ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. त्या निमित्ताने त्यांना भेटण्याचा योग आला. त्याआधी एकदा त्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या अतिथी संपादक म्हणून मटा कार्यालयात आल्या होत्या. एक दीड तास थांबतील असे वाटत असतानाच तब्बल चार तास त्यांनी मटातील सर्व सहकाऱ्यांशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या होत्या. तो दिवस आणि ते चार तास कधीच विसरणार नाही. नंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यात पुन्हा भेटल्या.
आपण मोठ्या गायिका आहोत याचा कोणताही बडेजाव नाही, बोलण्यात एकदम रोखठोकपणा, तोच चिरतरुण आवाज आणि अनेक किस्से सांगत समोरच्याला जणू हिप्नोटाईझ करण्याची किमया त्या सहज करतात. स्वत्चच्या संघर्षमय जीवनाचे उल्लेख जरूर येतात, पण ते बोलण्याच्या ओघात. मुद्दाम विषय काढून नव्हे. वेगवेगळ्या निमित्ताने आशाताई या ‘माणूस’ म्हणूनही किती थोर आहेत हे लक्षात येते आणि त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढतो. हा आदर मनामनात असल्यानेच त्यांना आशाबाई ऐवजी आशाताई म्हणतात असे वाटून गेले.
आशाताईना भारत सरकारने २००० साली दादासाहेब फाळके पुरस्कार दिला तर ‘भारतरत्न’नंतरचा दोन क्रमांकाचा ‘पद्मविभूषण ‘ २००८ साली दिला. या ‘पद्मविभूषण’नंतर त्यांना तेरा वर्षांनी ‘महाराष्ट्र भूषण’ मिळत आहे. हा ‘महाराष्ट्र भूषण’ मिळाला यात आनंदच आहे, परंतु तो बऱ्याच आधी मिळायला हवा होता असे मात्र राहूनराहून वाटते. ‘महाराष्ट्र भूषण’ महाराष्ट्र सरकार वर्षातून एकाच माणसाला देते.
‘महाराष्ट्र भूषण’ देणे १९९६ साली सुरु झाले. पहिले मानकरी होते पु. ल. देशपांडे. नंतर लता मंगेशकर, विजय भटकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, पं. भीमसेन जोशी, अभय व राणी बंग, बाबा आमटे, डॉ. रघुनाथ माशेलकर, रतन टाटा, रा. कृ. पाटील, नानासाहेब धर्माधिकारी, मंगेश पाडगावकर, सुलोचना दीदी, जयंत नारळीकर, डॉ. अनिल काकोडकर, बाबासाहेब पुरंदरे, राम सुतार आणि आता आशा भोसले असे मानकरी आहेत. ही सर्व मंडळी महाराष्ट्राची रत्ने आहेत आणि त्यांच्याबाबत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात, देशाबाहेरही अभिमानाची भावना आहे, हे सर्वाना माहीत आहेच. महाराष्ट्राने देशाला, जगाला दिलेले हे मोठे योगदान आहे.
दरवर्षी एकालाच पुरस्कार देण्याची प्रथा बदलावी असे वाटते. दिग्गज लोकांना वेळेवर पुरस्कार मिळायला हवेत. त्यासाठी एखाद्या वर्षी एकापेक्षा अधिक लोकांना पुरस्कार द्यायला काय हरकत आहे? भारतरत्न जाहीर करताना ‘एका वर्षी एकच ‘ असा नियम पाळला जात नाही. किंबहुना या पुरस्कारांच्या पहिल्याच वर्षी (१९५४) सी. राजगोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन व सी. व्ही. रामन या तिघांना भारतरत्न जाहीर झाले होते. १९५५ मध्ये भगवान दास , एम. विश्वेश्वरय्या, जवाहरलाल नेहरू या तिघांना भारतरत्न जाहीर झाले. यानंतरही एकापेक्षा अधिक भारतरत्न पुरस्कार दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. २०१९ मध्ये प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख याना हा पुरस्कार मिळाला आहे. एखादी व्यक्ती हयात असताना पुरस्कार मिळणे हे महत्वाचे असले तरी अनेकवेळा मरणोत्तर पुरस्कारही दिले जातात , ते काही कारणाने आवश्यकही असतात. तो भाग वेगळा.
पद्म पुरस्कारही उशिराने मिळाल्याच्या अनेक घटना आहेत. तो उशिरा जाहीर झाला म्हणू तो नाकारल्याच्याही घटना आहेत. नामवंत सुरबहार व सतारवादक उस्ताद इमरत खान याना १९८० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. त्यानंतर ३७ वर्षांनी पद्मश्री जाहीर झाली, ती त्यांनी नम्रपणे नाकारली. ”माझ्यापेक्षा कनिष्ठ लोकांना पद्म भूषण देऊन झाले, आता मला पद्मश्री नको’, असे त्यांचे म्हणणे होते. अशी अनेक उदाहरणे घडली आहेत.
विख्यात गायक शंकर महादेवन याना २०१९ मध्ये पद्म पुरस्कार मिळाला. त्यांचे मत वेगळे होते. ‘पद्म पुरस्कार लवकर दिला तर ‘इतक्या लवकर कसा मिळाला ‘ असे लोक विचारतात, त्यापेक्षा उशिरा मिळालेलाच चांगला ” , असे त्यांचे म्हणणे होते. काही चित्रपट कलाकारांना पद्मश्री मिळण्यासंदर्भात वाद झालेले आपल्या स्मरणात आहेतच. एकूण या पुरस्कार प्रकरणाकडे प्रत्येकजण वेगवेगळ्या दृष्टीने बघू शकतो. प्रत्येकाचे मत वेगवेगळे असू शकते, हे ध्यानात घ्यायला हवे. असो ! अनेक वेळा पुरस्कारांवरून वादही झाले. अमुक एका व्यक्तीपेक्षा तमुक एका व्यक्तीने जास्त महतवाचे काम केले आहे, त्यांना आधी पुरस्कार द्यायला हवा होता, अशी मते व्यक्त होणे नवीन नाही. काहीवेळा तर काहीजण न्यायालयाची पायरीही चढलेले आहेत. अगदी सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न देण्यावरूनही वाद झालेले आहेत.
आशाताईना मिळालेला पुरस्कार मात्र अशा वादांना अपवाद आहे. आशाताईना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर झाल्यावर समाजमाध्यमांमध्ये रसिक उत्स्फूर्तपणे व्यक्त झाले, प्रत्येकालाच आनंद झाला होता. आणि तो व्यक्त करताना , ”आपल्या आशाताई ‘महाराष्ट्र भूषण’ झाल्या” हा ‘आपले’पणाचा गोडवा त्यात होता. या बातमीनंतर सर्वांच्या मनात त्यांच्या असंख्य गाण्यांच्या ओळी आपसूक आल्या. ‘मलमली तारुण्य माझे ‘, ‘जिवलगा राहिले दूर घर माझे ” ही आणि इतर असंख्य गाणी कानात आपोआप वाजायला लागली. त्यांच्या गाण्याचे वैविध्य पाहिले की आपण अवाक होतो.
संगीत या प्रकाराला भाषेचा अडसर कधीच नसतो, तरीही प्रत्येक प्रकारातील आशाताई ‘आपल्या’ वाटतात. मग ते चित्रपट संगीत असो, पॉप म्युझिक असो, गझल, भजन, शास्त्रीय संगीत, कव्वाली, रवींद्र संगीत असो, अथवा लोकसंगीत, आशाताई यांचा आवाज मनाला मोहवून टाकतो. या त्यांच्या कर्तुत्वामुळेच त्या सगळ्यांच्या मनात घर करून बसल्या आहेत. एकदा ‘महाराष्ट्र टाइम्स’चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार कवी ना. धों. महानोर यांना देण्याचा कार्यक्रम (मटा सन्मान सोहळा) होता.
पुरस्कार देणार होत्या आशाताई. हे आधी जाहीर झाले नव्हते. महानोर यांना रंगमंचावर निमंत्रित करण्यात आले आणि मागोमाग आशाताई आल्या. त्यांना पाहताक्षणी टाळ्यांचा कडकडाट तर झालाच, परंतु क्षणाचाही विलंब न लावता सगळ्यांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली. ते दृश्य अजून डोळ्यासमोर आहे. ही मानवंदना त्यांना त्यांच्या लाखो चाहत्यांकडून अनेकवेळा मिळत राहिलेली आहे. स्थळ वेगळे, कार्यक्रम वेगळा, समोरचे लोक वेगळे, पण त्यांच्यातली भावना एकच. आशाताईंबद्दल अपार प्रेम आणि आदर !
आता आपण सगळे वाट पाहू या त्यांना ‘भारतरत्न’ मिळण्याची ! बरोबर ना ?
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!