गरिबी हटाव ते अब की बार
‘गरिबी हटाव ‘ ही घोषणा १९७१ची. म्हणजे आतापासून बरोबर ५० वर्षांपूर्वीची. प्रत्यक्षात गरिबी किती हटली हा वादाचा मुद्दा अजूनही आहे. अनेक राजकीय नेत्यांची ‘गरिबी’ मात्र हटली यात शंका नाही.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
ashok.panvalkar@gmail.com
अर्थतज्ज्ञ मंडळी या ‘गरिबी हटाव‘ वर अधिक प्रकाश टाकू शकतील. परंतु ‘गरिबी हटाओ ‘सारख्या घोषणा (स्लोगन्स) देऊन निवडणुका जिंकल्या गेल्या , काही घोषणा फसल्या आणि प्रसंगी पराभवही पत्करावा लागला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच अशा घोषणांचे पेव फुटले आणि अशा घोषणांची मतदाराला कायम भुरळ पडली. अगदी १९६५मध्ये पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान ‘ ही घोषणा केली होती. त्याचवर्षी भारताने पाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंकले , शास्त्री याना तुफान लोकप्रियता मिळाली, त्यांच्या अकाली निधनानंतरही ही घोषणा राजकीय पक्षांना अधूनमधून आठवत असते. परंतु ‘जय जवान, जय किसान ‘ म्हणताना शास्त्री यांनी कोणताही राजकीय दृष्टिकोन किंवा मतदान दृष्टिकोन समोर ठेवला नव्हता, असेच मी मानतो.
नंतर राजकारण बदलत गेले. निवडणुकीत विजय मिळवायला असे काहीतरी स्लोगन हवे असते हे राजकीय पक्षांच्या लक्षात आले. कारण सहाच वर्षांनी इंदिरा गांधी यांनी ‘गरिबी हटाओ, इंदिरा लाओ, देश बचाओ,’ ही घोषणा आणली. त्यातले ‘गरिबी हटाव‘ तेवढे आता उरले. तीही घोषणा अधूनमधून सगळ्या पक्षांना आठवते. तेव्हा या घोषणेने इंदिरा गांधी याना हात दिला, परंतु १९७५च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा १९७७मध्ये निवडणुका झाल्या, तेव्हा जनसंघाने ‘इंदिरा हटाओ, देश बचाओ‘ ही घोषणा आणली.

नंतर पुढे चिकमंगळूर निवडणुकीवेळी काँग्रेसने, ‘ एक शेरनी, सौ लंगूर, चिकमंगळूर भाई चिकमंगळूर’ ही घोषणा आणली. इंदिराजी तेव्हा जिंकल्या होत्या. १९८४मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसने ‘जब तक सूरज चांद रहेगा, इंदिरा तेरा नाम राहेगा’ हे स्लोगन आणले. त्यावेळी काँग्रेस मोठ्या बहुमताने निवडून आली खरी, पण आज २०२१ मध्ये इंदिराजी सोडून द्या, काँग्रेसचेच अस्तित्व किती राहिले हा प्रश्नच आहे. निवडणूक असो किंवा अन्य वेळ, वेगवेगळ्या घोषणा देण्यात लालूप्रसाद यादव यांचा हात कोणी धरू शकणार नाही. ‘जब तक रहेगा समोसे में आलू, तब तक रहेगा बिहार में लालू ‘ ही घोषणा गाजली. आता सध्या लालू तुरुंगात आहेत हा भाग वेगळा!
सुमारे २५ वर्षांपूर्वी, १९९६मध्ये भारतीय जनता पक्षाने ‘बारी बारी सब की बारी, अब की बारी अटलबिहारी ‘ ही घोषणा गाजली. अटलजी निवडूनही आले. परंतु सरकार फार काळ टिकू शकले नाही. नंतर एनडीएने ‘इंडिया शायनिंग’ ची घोषणा केली. या मोहिमेच्या जाहिरातींनी प्रसारमाध्यमांचा भरपूर फायदा झाला, भाजपला फायदा झाला नाही. याला उत्तर म्हणून काँग्रेसने ‘काँग्रेस का हाथ, आम आदमी के साथ ‘असे म्हणणे सुरु केले. त्याचे फळ काँग्रेसला मिळाले.
