नवी दिल्ली, मुंबई – आता भारतीय रेल्वे बर्निंग ट्रेनच्या संकटातून मुक्त होणार आहे आणि प्रवाश्यांच्या सुरक्षिततेलाही धोका पोहोचणार नाही. एखाद्या बोगीतून धूर निघाला तर ट्रेन स्वतःहून थांबेल आणि प्रवाश्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढता येईल.
रेल्वे गाड्यांमध्ये आग लागण्याच्या घटना वाढत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने आधुनिकीकरणाच्या दिशेने फोकस वाढवला. त्यातूनच नवी यंत्रणा बसविण्यात आली आहे. ज्यात गाडीतून कुठल्याही डब्यातून धूर निघाल्यास ट्रेनमधील आलार्म वाचेल आणि नंतर ट्रेन स्वतःहून थांबेल. काही दिवसांपूर्वी दिल्लीहून डेहराडूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसमध्ये आग लागली तेव्हा आलार्म वाचल्यामुळेच प्रवासी अॅलर्ट झाले होते.
या व्यवस्थेसाठी कोचमध्ये स्वतंत्र यंत्रणा आहे. इंटीग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये (आयसीएफ) २०१९ मध्ये अशा पद्धतीचे कोच तयार झाले होते. यात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. पण आता त्यात आणखी बदल करून धूर निघताच ट्रेन थांबेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात एसी कोचमध्ये ही व्यवस्था सुरू होईल. कारण रेल्वेमधील आगीच्या घटनांनी रेल्वे प्रशासन व मंत्रालय त्रस्त झाले आहे.२०१७-१८ मध्ये अश्या तीन घटना घडल्या होत्या, तर २०१८-१९ मध्ये सहा आणि २०१९-२० मध्ये आठ घटनांची नोंद झाली आहे.