आज जगभरात हृदय दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने हा विशेष लेख…
– मुकुंद बाविस्कर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
जगातील सर्व आजार नष्ट झाले असून आता जगभरात केवळ एकच शिल्लक आहे, तो म्हणजे कोरोना असे सध्या गमतीने म्हटले जात आहे, तसेच असे संदेश देखील संवाद माध्यमातून फिरत आहेत. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव मान्य केला तरी जगभरात मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, क्षयरोग या सारखे दहा गंभीर आजार असून त्यातील पहिल्या पाच गंभीर आजारात हृदयरोगाचा समावेश होतो. त्यामुळे आपल्या हृदयाची आपण हृदयापासून (दिलसे) काळजी घ्यावी असे म्हटले जाते. हृदयरोग हा अत्यंत गंभीर आजार असून जागतिक आरोग्य संघटनेने देखील यासंबंधी चिंता व्यक्त केली आहे. तर आरोग्यपूर्ण जीवनशैलीने हृदयरोगासारख्या गंभीर आजारावर मात करणे शक्य आहे, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले असून कोरोनाच्या संकटकाळात या हृदयरोगाने ग्रस्त असलेल्यांनी आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, असा सल्ला देखील दिला आहे.
१९९९ मध्ये सर्वप्रथम दि. २९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदयरोग दिन म्हणून पाळण्यात आला. वर्ल्ड हार्ट फेडरेशन आणि या संस्थेच्या सहयोगी सदस्य संघटनांतर्फे दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. या उपक्रमांना जागतिक आरोग्य संघटना तसेच युनोस्को यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. दर वर्षी जगभरात सुमारे १ कोटी ९० लाख लोक हृदयरोग यासारख्या गंभीर आजाराने मृत्युमुखी पडतात, अशी माहिती एका अहवालात देण्यात आली आहे . आज जगभरातील सर्वच देशात वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या १८६ सदस्य संस्था आणि संघटनांमार्फत हा दिन साजरा केला जातो. जागतिक हृदय दिनाचे कायमस्वरूपी घोषवाक्य आहे, द हार्ट ऑफ लाइफ अर्थात जीवनासाठी हृदय . तसेच दरवर्षी एखाद्या विशिष्ट पैलूवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दरवर्षी वेगवेगळे घोषवाक्य देखील दिले जाते. यंदाच्या घोषवाक्य आहे, सीव्हीडीचा (कार्डीओ व्हॅस्कूलर डिसीज) पराभव करण्यासाठी आपल्या हृदयाचा उपयोग करा. म्हणजे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या संबंधीच्या उच्च रक्तदाब सारख्या गंभीर आजाराबद्दल समाजात जागरुकता निर्माण करा , असा या संदेशाचा अर्थ आहे.
भारतात रक्तवाहिन्यांच्या आजाराबद्दल फारशी जागरूकता नाही, म्हणून या रोगाने मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे, असे एक प्रमुख कारण सांगण्यात येते. त्याचप्रमाणे दुसरे कारण म्हणजे उच्च रक्तदाबाच्या बाबतची गंभीर समस्या होय. हृदयरोग कुणालाही म्हणजे कोणत्याही वयोगटातील स्त्री, पुरूषांना होऊ शकतो,
नाशिक येथील साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचे हृदयरोग तज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी सांगितले की, आपल्याकडे हृदयविकार, मधुमेह यासारख्या आजारांचे प्रमाण वाढलेले दिसते. यातच बदलत्या जीवनशैलीचा परिणाम दिसतो. हे टाळण्यासाठी आहार-विहार आणि व्यायाम याला महत्त्व देणे आवश्यक आहे. विशेषतः दररोज योगा केल्यास हृदयरोग सारखे आजार टाळता येऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे हे रोग असल्याने व्यक्ती संपूर्णपणे या रोगावर नियंत्रण मिळवू शकते, श्रीमंत लोकांनाच हा आजार होतो, असे अनेक गैरसमज आहेत, वास्तवात अतिशय गरीब देशातील हृदयरोगाचे प्रमाण देखील अधिक असून ते दिसून येत नाही, तसेच या रोगांचे उपचार व प्रतिबंधासाठी लागणाऱ्या मोठ्या निधीमुळे अशा देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाला खीळ बसू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
हृदयरोग होण्याची प्रमुख कारणे – उच्चरक्तदाब, तंबाखूचे सेवन, मद्यपान, धुम्रपान, रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉल तसेच लठ्ठपणा हे हृदयरोग होण्याच्या आणि अनारोग्याला कारणीभूत ठरणाऱ्या पहिल्या दहा घटकांपैकी महत्त्वाचे घटक आहेत.
हृदयरोगामुळे जगात दरवर्षी सुमारे १ कोटी ९० लाख लोक मृत्युमुखी पडतात. भारतात हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याने मृत्यू होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. शहरी लोकांमध्ये या रोगाचे प्रमाण ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत तीन टक्के इतके जास्त आहे. ग्रामीण भागात व्यक्तीमध्ये या रोगाचे प्रमाण २.७ टक्के तर शहरी मध्ये ९.४ टक्के असल्याचे दिसून आले आहे. आपल्या देशात चुकीची जीवनशैली, शारीरिक शिक्षणाचा अभाव, तंबाखूचे सेवन, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह या सारख्या घटकांमुळे हृदयरोगाचे प्रमाण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढलेले दिसते . तसेच रक्तातील कोलेस्टेरॉलचे वाढलेले हृदयविकाराच्या झटक्याचा कारणीभूत ठरू शकते.
या संबंधी उपाययोजना बाबत आहार तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दिक्षित यांनी स्पष्ट केले की, हृदयरोग टाळण्यासाठी योग्य आहारावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे, दररोज समतोल आहार घ्यावा, जेवणात मुबलक प्रमाणात हिरव्या पालेभाज्या तसेच फळे असावीत, तृणधान्य, कडधान्य यांचा समावेश करावा, मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करावे, तसेच फास्ट फूड खाणे टाळावे, दररोज निदान सहा ते आठ ग्लास पाणी प्यावे, दररोज तीस मिनिटात जोरात चालल्याने प्रौढ व्यक्तीमध्ये हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो. मुलांनी दररोज निदान तासभर तरी शारीरिक व्यायाम होईल येवढे खेळायला हवे, तसेच मोबाईल गेम व टीव्हीचा वापर देखील कमी प्रमाणात व्हायला हवा, घराजवळच कामासाठी जाताना सायकलचा वापर करणे, दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर टाळणे, लिफ्ट ऐवजी जिन्याचा वापर करणे, पायी चालणे अशा अनेक सवयी लावायला हव्यात, असेही ते म्हणाले.
हृदयरोग होण्याचे वाढते कारण म्हणजे ताणतणाव, चुकीची व आरामदायी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयरोग यासारख्या आजार वाढू लागला आहे. सध्या कोरोनाच्या साथीच्या काळात हृदयाची विशेष काळजी घ्यायला हवी, असे मत अपोलो रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. राहुल गुप्ता यांनी व्यक्त केले. कोरोनाची लागण झालेल्या व चाचणी झालेल्यापैकी २० टक्के रुग्ण हे हृदयरोगाने ग्रस्त असलेले दिसून आले. भारतात मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चंदीगड, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद अशा मोठ्या शहरात हृदयरोगाचे प्रमाण वाढलेले आहे, असेही ते म्हणाले.
उच्च रक्तदाबात काही रुग्णांचा रक्ताचा दाब अचानक वाढतो, त्याकडे दुर्लक्ष केल्यास मेंदूतला कमी रक्तपुरवठा होऊन रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. मग हृदय बंद पडणे, हृदयाची स्पंदने अनियमित होणे अशी कारणे दिसतात. डोकेदुखी, दृष्टी अंधुक होणे, थकवा, छाती दुखणे, नाकातून वारंवार रक्त येणे, श्वास लागणे, पाय दुखणे, चक्कर येणे आदी लक्षणे आढळून येतात. त्यासाठी काळजी घ्यायला हवी, नियमित आरोग्य तपासणी करावी, असे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शिरीष साठे यांनी सांगितले. तसेच गेल्या पाच वर्षात भारतात सुमारे ३० ते ५० टक्के पर्यंत या लक्षणांचे प्रमाण वाढले असून अनेकांना मधुमेहाचा त्रास जाणवतो. हृदयाला रक्तपुरवठा करणारी एखादी रक्तवाहिनी बंद पडली तर रक्तपुरवठा बंद होता आणि हृदय विकाराचा झटका येतो, त्याकरिता सर्वांनी काळजी घ्यावी, घाबरून जाऊ नये, असे ते म्हणाले.