येवला ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्हयात अनेक अडचणींवर मात करत शेतक-यांनी कांद्याच उत्पादन घेतले मात्र सध्या कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. येवल्याच्या नगरसूल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे याने थेट आपल्या रक्ताने पत्र लिहिले आहे. या पत्रात शेतक-यांपुढे अनेक प्रश्न असतांना त्याला कांदा रडवतोय. त्याचा उत्पादन खर्च वसूल होत नसून केंद्रातील भाजपाचे धोरण शेतकरी विरोधी आहे. आपणही शेतक-याचे पुत्र असून आपण या विरोधात आवाज उठवायला पाहिजे होता. मात्र आपणही गप्प का ? असा प्रश्न त्याने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात विचारला आहे. तर आपण काही करु शकत नसाल तरी मी ठेवलेल्या कांदा अग्नीडाग कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आग्रहाचे निमंत्रण त्याने रक्ताने लिहिलेल्या पत्रात केले आहे. हे सर्व पत्र कृष्णा याने पोस्ट सुध्दा केली आहे.
कांद्याला भाव मिळत नसल्याने कृष्णा डोंगरे याने येत्या सहा मार्चला आपल्या शेतातील कांद्याला अग्निडाग देण्याचा समारंभाचे आयोजन केले असून त्याच्या जाहीर निमंत्रण पत्रिका त्याने छापल्या आहेत. या पत्रिका त्यांनी सोशल मीडियावर सुध्दा पोस्ट केल्या असून त्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे काही वर्षा पूर्वी याच कांदा प्रश्नावर कृष्णा याने आपल्या शेतातील कांदा जाळला होता. त्यावेळी मोठी चर्चा माध्यमांमधून झाल्याने विरोधी पक्षाच्या खासदार सुप्रिर्याताई सुळे यांनी थेट नगरसूल येथे धाव घेत कृष्णा डोंगरे यांची भेट घेतली होती.