इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मंत्री नरहरी झिरवळ यांनी लाडकी बहिण योजनेबद्दल एक मोठे विधान केले होते. त्यांना लाडकी बहिणींना २१०० रुपये हप्ता कधी मिळणार? असे विचारण्यात आल्यावर त्यांनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये हप्ता देणार असे कोणीही म्हटले नाही. लाडक्या बहिणी १५०० रुपयांमध्ये आनंदी आहेत असे म्हटले होते.
त्यानंतर त्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. या विधानानंतर काल दिवसभर हा विषय चर्चेत होता. पण, आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या विधानाचा समाचार घेतला आहे.
वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, नरहरी झिरवळ आता मंत्री झाले आहेत, त्यामुळे त्यांनी लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाची माहिती घेतली पाहिजे. निवडणुकीदरम्यान भाजप आणि महायुतीने बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता सरकार पळवाट शोधत आहे. यावरून सरकारची नियतच खोटी असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.