नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –डायबिटीस किंवा मधुमेह हा आजार झपाट्याने वाढत आहे. बदलती जीवनशैली हे मुख्य कारण आहे. सध्या हा आजार अतिशय सामान्य झाला आहे. याला कारण म्हणजे व्यक्तीचा दिनक्रम आणि डाएट बदलला आहे. वाढत्या सुविधानुसार आता घरी बसल्या अनेक गोष्टी उपलब्ध होतात. त्यातच मोबाईल, टिव्ही, संगणक आणि घर बसल्या खेळता येणारे मोबाइल गेम यामुळे मैदानी खेळ कमी झाले असून स्त्री, पुरुष आणि मुलांची हालचाल कमी झाली आहे. त्यामुळे मधुमेह आजार अबाल वृद्धांमध्ये वाढू लागला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, आपल्या देशात मधुमेह हे एक वाढते आव्हान आहे. २०ते ७० वयोगटातील ८.७ टक्के नागरिकांवर याचा परिणाम होतो.
बरेचदा डायबिटिजची लक्षणे अनेकदा उशिरा कळतात. तोपर्यंत मधुमेहाची लागण झालेली असतात. मधुमेहाची लागण झाल्यावर शरीरात काही बदल होतात. जसेकी, सतत लघवीला होणे, भूक आणि तहान अधिक प्रमाणात लागणे, नजर कमी होणे, थकवा जाणवणे, चिडचिडेपणा वाढणे, जखम झाल्यास ती लवकर बरी न होणे, यासारखे प्राथमिक लक्षणे दिसून येतात. सध्या डायबेटिस अर्थात मधुमेह हा गंभीर स्वरुपाचा आजार बनला आहे. डायबेटिसमुळे डोळ्यांचे विकार, किडनी आणि हृदयविकार होण्याची शक्यता असते. डायबेटिस हा शरीरात गुंतागुंत निर्माण करणारा आजार आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, लठ्ठपणा, अनुवंशिकता आदी गोष्टींमुळे डायबेटिस होतो, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
एकदा डायबेटिसचे निदान झाले की, तो पूर्ण बरा होत नाही. त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी रुग्णाला विशेष प्रयत्न करावे लागतात. डायबेटिस असलेल्या काही रुग्णांना रोज इन्शुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते, शरीरातील इन्शुलिन निर्मितीची प्रक्रिया बिघडल्याने डायबेटिस नियंत्रणात राहण्यासाठी काही रुग्णांना बाह्य इन्शुलिनवर अवलंबून राहावे लागते; पण आता रुग्णाला कदाचित भविष्यात बाह्य इन्शुलिनवर अवलंबून राहावे लागणार नाही.
यासोबतच दररोज व्यायाम करणे हा देखील एक महत्त्वपूर्ण उपचार आहे. यासाठी डॉक्टरांकडे जाऊन आपल्या वयानुसार किंवा आपल्या जीवनशैली अनुसार व्यायामाचे प्रकार समजावून घेऊन व्यायाम केला तर मधुमेह बऱ्याच प्रमाणात आटोक्यात ठेवला जाऊ शकतो. परंतु आता केंद्र सरकारने मधुमेहाच्या रुग्णांना मोठा दिलासा आहे. Sitagliptin हे मधुमेहावरचे प्रभावी औषध बाजारात दाखल केले आहे.
विशेष म्हणजे या Sitagliptin गोळ्या अत्यंत स्वस्त उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. १० गोळ्याचे पाकीट (स्ट्रीप) अवघ्या ६० रुपयांना मधुमेही रुग्णांना मिळणार आहे. देशातील जनऔषधी विक्री केंद्रावर या गोळ्या उपलब्ध होतील. फॉर्मास्यूटिकल्स आणि मेडिकल डिवायसेस ब्यूरो ऑफ इंडिया (PMBI) यांनी त्यांच्या जन औषधी केंद्रांच्या यादीत Sitagliptin गोळ्यांचा समावेश केला आहे.
सध्या देशात मिळणाऱ्या ब्रँडेड कंपन्यांच्या मधुमेहावरील औषधांपेक्षा ही औषधे ६० ते ७० टक्के कमी किंमतींना मिळत आहे. तसेच सध्या मधुमेहावरील ब्रँडेड कंपन्यांच्या औषधांची किंमत १६० ते २६० रुपयांपर्यंत आहे. त्यापेक्षा सरकारने नव्याने दाखल केलेले औषध प्रचंड स्वस्त आहे. पूर्वीपेक्षा ते शंभर ते दोनशे रुपयांनी रुग्णांना स्वस्त पडणार आहेत.
इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च इंडिया (ICMR) यांच्या अंदाजानुसार, सध्या भारतात ७ कोटी ४० लाख नागरिक मधुमेहाचे शिकार आहेत. त्यांचा औषधांचाच खर्च कोट्यवधी रुपये आहे. देशात मधुमेहाच्या प्राथमिक अवस्थेत असलेली अनेक रुग्ण पुढील गंभीर स्वरुपाच्या या आजाराला बळी पडत आहे. त्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे ICMR ने स्पष्ट केले आहे. मात्र आता मधुमेह रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
Union Government Diabetes Patient Medicines Price