रविंद्र धारणे
त्र्यंबकेश्वर – पौष वद्य एकादशी अर्थात बुधवार रोजी संपन्न होत असलेल्या श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मध्ये भाविकांची गर्दी वाढत असून राज्याच्या कानाकोपर्यातुन वारकर्यांच्या दिंड्या दाखल होत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमिवर ठिकठिकाणांहून निघालेल्या पायी दिंड्या रविवार पासूनच त्र्यंबक नगरीत दाखल होत आहे. नाशिक-त्र्यंबक, जव्हार-त्र्यंबक तसेच घोटी-त्र्यंबक असे तिनही मार्ग भगवेमय झाले असून टाळमृदुंगाच्या गजराने व हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेले आहे. ठिकठिकाणी दिड्यांचे स्वागत करण्यात आले.
त्र्यंबकेश्वरच्या प्रवेशद्वारावर श्री गजानन महाराज संस्थान व नगर परिषदेच्या वतीने प्रशासकीय अधिकारी संजय मिसर, भगवान खोडे यांनी प्रत्येक दिंडीचे स्वागत केले. भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेत कुशावर्त तिर्थाला वंदन करून दिंड्या निवृत्तीनाथ मंदिराकडे प्रस्थान करीत आहे. निवृत्तीनाथ मंदिर संस्थानच्या वतीने परंपरेनुसार प्रत्येक दिंडीच स्वागत करण्यात येत आहे. नाथांचे दर्शन घेऊन दिंड्या आपापल्या मुक्कामाच्या जागेवर जात आहेत.भागवत पंथामध्ये ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे मुक्कामावर थांबलेल्या दिंड्यांमधील शेकडो भाविक टाळमृदुंगाच्या गजरात अभंग गात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला मार्गस्थ होतील.