मुंबई – प्रीपेड ग्राहकांना झटका दिल्यानंतर दूरसंचार कंपन्या आता पोस्टपेड ग्राहकांना झटका देणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया ग्राहकांचे प्लॅन महाग करण्याची शक्यता आहे. यापूर्वी एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांचे टेरिफ जुलैमध्ये वाढविले होते. तसेच फॅमिली प्लॅनमध्ये बदल करण्यात आला होता. रिलायन्स जिओ या दिग्गज टेलिकॉम कंपनीनेसुद्धा एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियानंतर त्यांचेही प्रीपेड प्लॅन या महिन्यापासून महाग केले आहेत.
महाग होण्याचे परिणाम
जाणकारांच्या माहितीनुसार, दूरसंचार कंपन्यांच्या पोस्टपेड टेरिफमध्ये जितका उशीर होईल, तितके कंपन्यांना नुकसान होणार आहे. एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्या प्लॅन महाग करणार असतील, ग्राहक आणखी कुठेही जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. कारण त्यांच्यासाठी ब्रँडला प्राधान्य देणे आणि चांगला अनुभव मिळणे महत्त्वाचे असते.
भारतात सर्वात स्वस्त प्लॅन
काही दिवसांपूर्वी प्रीपेड प्लॅनच्या किमतीत वाढ केल्यानंतर जगामध्ये भारतात टेरिफ सर्वात स्वस्त आहे. भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने यापूर्वीच बाजारात आपली स्थिती भक्कम ठेवण्यासाठी ३०० रुपयांचा एआरपीयू (अॅव्हरेज रियलायजेशन प्रति वापरकर्ता) पर्यंत पोहचण्याचे संकेत दिले आहेत. आता एआरपीयू १३० रुपये आहे. पाच वर्षांपूर्वी तो २०० रुपयांहून अधिक होता. त्यामुळे कंपन्यांनी आधीपासूनच २०० रुपयांच्या एआरपीयूपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे. व्होडाफोन आयडियाचा एआरपीयू आता १०९ रुपये आणि भारती एअरटेलचा १५३ रुपये आहे. रिलायन्स जिओसाठी एआरपीयू १४३.६ रुपये आहे.