नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांद्याच्या भावात दिवसागणिक होणारी घसरण अद्याप सुरुच आहे. गेल्या सात दिवसांत उन्हाळ कांद्याचे दर सरासरी ७५० ते ८०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. कांदा दरात थोडीही भाववाढ होत नसल्याने तसेच खरिपासाठी लागणारा पैसा कांदा विक्रीतूनच उभा करावा लागणार असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. कांद्याचे भाव का गडगडत आहेत, असा प्रश्न उत्पादकांसह सर्वांनाच पडला आहे.
कांद्याच्या दरात सतत होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली तेव्हा कांद्याचा सरासरी भाव १४०० ते १४५० रुपये होते. पण नंतर भाव वाढण्याऐवजी घसरत गेले आणि शेतकऱ्यांना निराशेचा सामना करावा लागला. या दर घसरणीमागे नेमके कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामागे श्रीलंकेतली दिवाळखोरी आणि बांग्लादेशमधील आर्थिक कोंडी असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही देशांमध्ये भारताकडून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात केली जाते.
सद्यस्थितीतही कांद्याची मागणी या देशांकडून होत आहे. पण कांदा निर्यात केला तरी त्याचा मोबदला मिळेल की नाही ही शंका असल्याने व्यापाऱ्यांना निर्यातीकडे पाठ फिरवण्याची वेळ आली आहे. या निर्यातीतून व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक नफा होत असतो. पण हा सगळा माल आता व्यापाऱ्यांकडेच पडून राहिल्याने एक– दोन रुपये किलो कांदा विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
या सगळ्या परिस्थितीत बाकी देशांमध्ये भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तानी कांद्याला पसंती मिळत आहे. कारण पाकिस्तानी कांदा भारतीय कांद्यापेक्षा स्वस्त आहे. भारतात कांद्यासाठी प्रतिकूल परिस्थिती असतानादेखील उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. या सगळ्या परिस्थितीचा फटका शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे.
त्यातच अपेक्षा असलेल्या नाफेड कडूनही अल्प प्रमाणात कांदा खरेदी केली जात आहे, शेतकऱ्यांनी कांदा विकावा तरी कोणाला, असा प्रश्न पडला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याची शुक्रवारी १८ हजार २३८ क्विंटल इतकी आवक होती. या कांद्याला सरासरी ८८०, जास्तीत जास्त १३५५ आणि सरासरी ५०० रुपये प्रतिक्विंटल भाव होता. पिंपळगाव बाजार समितीत शुक्रवारी १०९५ वाहनातून उन्हाळ कांद्याची आवक झाली. त्यास कमीत कमी ६००, जास्तीत जास्त १६०० सरासरी ८५० रुपये भाव मिळाला.
श्रीलंकेसारख्या देशात सध्या बहुतांश गोष्टींचा तुटवडा आहे. या देशात निर्यात शक्य आहे मात्र आर्थिक परतावा मिळण्याची शक्यता नसल्याने माल असूनही पुरवठा करण्यास व्यापारी धजावत नसल्याचे चित्र आहे. तर, कांद्याला भाव नसल्याने बुलढाणा जिल्ह्यात तर शेतकऱ्यांनी कांदा फुकट वाटल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे एकंदरीतच यंदा कांदा वांदा करणार असल्याचे बोलले जात आहे.