प्रतिनिधी, जळगाव
काही महिन्यांपूर्वी राज्यात कोरोनाचा प्रचंड संसर्ग वाढत होता, तेव्हा जळगाव जिल्हा हा संपूर्ण देशात हॉटस्पॉट म्हणून चर्चेला आला होता. मात्र प्रशासनाने उपाययोजनांबाबत घेतलेली गंभीर दखल आणि त्याला जनतेने दिलेली साथ याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. सध्या जळगाव जिल्ह्यात नोंद होत असलेल्या कोरोना बाधितांची संख्या पाहता कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली असल्याचे दिसून येत आहे.
साधारणतः फेब्रुवारी मार्चनंतर राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या मोठ्या शहरांमध्ये धोरणाचा संसर्ग वाढल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. त्याच वेळी खानदेशातील जळगाव जिल्हा हा जणूकाही कोरोनाचे हॉटस्पॉट बनला होता. मात्र आता जिल्हाभरात कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू खूपच कमी झाली आहे. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या सध्या नाहीच्या बरोबर असली तरी कोरोनाची भिती अद्याप तरी संपलेला नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हाधकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोनाची सक्रीय रुग्णसंख्या ३६६ इतकी आहे. गेल्या आठ दिवसांपासून वीसच्या आत बाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. शिवाय पॉझिटीव्हिटी दरही एक टक्के आलेला असल्याने जळगाव जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियत्रण मिळविण्यात यश मिळाल्याच्या मागील कारणाबाबत विचार केला तर दुसऱ्या लाटेदरम्यान जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम राबविली होती. यामध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले होते.
सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशन यांचा वापर करण्यासंदर्भात करण्यात आलेली जनजागृती आणि जिल्ह्यातील आठ लाख लोकांना करण्यात आलेले लसीकरण या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश मिळालं असल्याचं दिसत असले तरी कोरोना अद्याप पूर्णपणाने संपलेला नाही. त्यामुळे पुढील काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे नागरिकांना लस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.