निसर्ग यात्री
पर्यावरण हा मानवी जिव्हाळ्याचा विषय आहे. याच पर्यावरणासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या आणि निसर्ग सान्निध्यात राहून आपलं जीवन फुलविणाऱ्या दाम्पत्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी ही विशेष लेखमाला आजपासून दर आठवड्याला….
भारत, नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असा देश साधनसंपत्तीच्यामानाने लोकसंख्या जरी जास्त असली तरी इथले लोक निसर्गाशी हजारो वर्षांपासून एकरूप आहेत. वेदांमध्येदेखील पंचमहाभूतांशी मिळूनमिसळून वागायला शिकवले गेले आहे. नव्हे, परमेश्वरस्वरूप मानले गेले आहे. म्हणून सूर्याला सूर्यनारायण,धरित्रीला माता, वाऱ्याला वायुदेव, पाण्याला पर्जन्यदेव आणि आकाशाला विश्वब्रह्मांड म्हणून गौरवले गेले आहे. ही पंचमहाभूते म्हणजेच कोणत्याही सजीवाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी तत्व आहेत. सूर्याचं तेज आणि ऊर्जा, पाणी, वायु रूपातून प्राणवायू, पृथ्वीरूपातून अन्नधान्यआदी सामग्री या सर्वांवर मानवी जीवन आधारलेलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण हेदेखील पंचमहाभूतांच्या पूजेसाठीच साजरे केले जातात.
पुराणात एक श्लोक दिलेला आहे
अश्वत्थमेकं पिचुमन्दमेकं न्यग्रोधमेकं दशाचिग्चिणीकं कपित्थबिलवामलकीत्रयं च पश्चाम्ररोपी नरकं न पश्येत् ।।
याचा अर्थ असा की, जो मानव एक पिंपळ, एक नींबवृक्ष,एक वड ,दहा चिंचवृक्ष, तीन कवठाची, तीन बेलाची,तीन आवळीची आणि पाच आंब्याची झाडे लावतो तो कधीच नरक पहात नाही. एका वृक्षाचे महत्व दहा पुत्रांएवढे आहे असेदेखील पुराणात म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील आज्ञापत्र तयार केलं होतं, ज्यात त्यांनी जंगल संपत्ती कमी होऊ नये यासाठी सरदारांना तशा सूचनाही दिल्या होत्या पण, मनुष्याने आश्चर्यकारकरिता केलेल्या या वैज्ञानिक प्रगतीबरोबरच पर्यावरणाकडे मात्र नंतरच्या काळात खूपच दुर्लक्ष केलं.
माणूस जर अजूनही जागा झाला नाही तर एकविसाव्या शतकात आपला इथिओपिया व्हायला वेळ लागणार नाही असे एका जागतिक शेतकी तज्ञाने मत व्यक्त केले आहे. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच पर्यावरणाची अनेक बाजूंनी कोंडी व्हायला लागली आहे. प्रचंड प्रमाणात वाढत जाणारी लोकसंख्या, तापमानात होणारी वाढ, पाणीसाठ्याच्या खाली जात असलेल्या पातळ्या, शेतजमिनींचे कमी होणारे प्रमाण, संसाधनांची अमाप उधळपट्टी, संपुष्टात येत चाललेला मत्स्यव्यवसाय, आक्रसत चाललेली जंगलं, वनस्पती,प्राणी यांची कधीही भरून न येणारी हानी आणि हे असं सारं भीषण काळाकुट्ट चित्र आहे. त्यासाठी सामान्यांच्या मनावर आलेली मरगळ आणि डोळ्यांवर बांधलेली झापडं दूर होणं अत्यंत आवश्यक आहे.
कुठलीही पर्यावरणहानी आपण हेतुपूर्वक केलेली नसली तरी या विनाशात आपल्या अप्रत्यक्षरीत्या देखील वाटा असू शकतो त्यासाठी लहान मुलांना आणि तरुण पिढीला योग्य मार्गावर नेणं. त्यांना चंगळवाद, उपभोगवाद या संस्कृतीपेक्षा माती पुढे लीन होऊन निसर्गाचा सेवक होणं शिकवता आलं पाहिजे. इतर कोणत्याही धांगडधिंगा संगीतापेक्षा निसर्गातलं संगीत निसर्गाशी एकरूप होऊन ऐकता आलं पाहिजे.
त्यासाठी मुख्य प्रवाहाला हिंमतीने नाकारून त्यातून बाहेर पडणारे,आत्मसन्मानासाठी वेगळ्या वाटा अवलंबणारे बरेच लोक आपल्या आजूबाजूला असतात. जे खरंतर प्रकाशझोतात फार कमी येतात कारण त्यांचा उद्देशच पर्यावरणस्नेही राहून जीवनातील गुंतागुंत कमी करणे आणि निखळ नैसर्गिक जीवन जगणं हा असतो. म्हटलं तर अतिशय सामान्य वाटणारी ही मंडळी, त्यांचं आणि पर्यायाने समाजाचंदेखील जीवन समृद्ध करत असतात.
“The reasonable man adopts himself to the world. Unreasonable one persists in trying to adopt the world to himself.Therefore all progress depends on the unreasonable.”
– GeorgeBernard Shaw
(साधारण व्यक्ती जगरहाटीत स्वतःला सामावून घेते तर असाधारण व्यक्ती जगरहाटीत स्वतःला अनुरूप किंवा अनुकूल करून घेण्यासाठी प्रयत्नशील असते अशा असाधारण भागीरथांवरच समाजाची प्रगती अवलंबून असते.)
पर्यावरण रक्षणासाठी विविध मोहिमा ‘सामर्थ्य आहे चळवळीचे’ या उक्तीनुसार चालवल्या जातात.पण, काहीजण वैयक्तिकरित्या किंवा त्यांच्या कौटुंबिक सहभागातून या पर्यावरणरक्षणाच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलत असतात. प्रत्येकवेळेस कोणतंही आंदोलन करूनच गोष्टी साध्य होत नाहीत, त्यासाठी काही जण त्यांच्या पर्यावरणस्नेही जीवनशैलीतूनदेखील इतरांसमोर आदर्श निर्माण करतात. त्यासाठी काहींनी तंत्रज्ञानाचीदेखील मदत घेतली आहे. त्यांच्या मते माणसाला प्रगती करायची असेल तर एक हात मातीत असावा आणि दुसरा हात संगणकावर तरच मनुष्याला त्याची मातीशी असलेली नाळ निसर्गाशी जोडेल आणि संगणकावरचा हात आकाशाला गवसणी घालेल अशाच काही प्रकाशात आलेल्या तर काही प्रकाशात न येताही अविरत आपलं कार्य करणाऱ्या पर्यावरण रक्षकांची ओळख आपल्याला निसर्गा यात्री या सदरात करून देत आहोत. अपेक्षा आहे की आपल्याला ही लेखमाला नक्कीच आवडेल…