श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला-३६
श्रीअरविंद-क्रांतिकारक ते महायोगी
श्रीकृष्ण चेतनेचे अवतरण
(श्रीअरविंद-आश्रमाची जबाबदारी श्रीमाताजी ह्यांच्याकडे सोपविण्यात आली तो प्रसंग त्या स्वतः सांगत आहेत…)
व्यक्तीमध्ये देवदेवतांचे अवतरण घडवून आणण्यासाठी, मी तेव्हा ‘अधिमानसिक निर्मिती’ला (Overmind Creation) एक प्रकारे सुरुवात केली होती आणि त्यावेळी गोष्टी एका असामान्य ऊर्ध्वगामी वळणावर जाऊन पोहोचल्या होत्या. मी माझ्या स्वत:च्या अंत:चक्षुंनी पाहिले, तेव्हा ‘श्रीकृष्णाने स्वत:ला श्रीअरविंदांमध्ये एकजीव केले आहे’, असे मला दिसले. मग मी श्रीअरविंदांच्या खोलीत गेले आणि त्यांना म्हणाले, ”मला आत्ता असे असे दिसले.” ते म्हणाले, “हो, मला माहीत आहे. हे उत्तम झाले. आता मी माझ्या खोलीतच राहायचे ठरविले आहे, तेव्हा तुम्ही आता सर्व साधकांची जबाबदारी घ्या.”
पुढे श्रीमाताजी सांगतात, आलेल्या प्रत्येकाला भेटण्यासाठी पूर्वी, श्रीअरविंद व्हरांड्यामध्ये जात असत आणि त्यांना भेटायला आलेल्या प्रत्येकाशी ते बोलत असत. (येथेच साधक श्री. निरोदबरन यांच्या ‘Talks with Sri Aurobindo’ या प्रसिद्ध पुस्तकाची निर्मिती झाली.) तेव्हा मी आतल्या खोलीमध्ये थांबत असे आणि कोणालाही भेटत नसे. ते मात्र व्हरांड्यात जात असत, प्रत्येकाला भेटत असत, आलेल्या लोकांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे, चर्चा करणे असे सारे चालत असे. ते जेव्हा आत येत असत तेव्हाच फक्त मी त्यांना भेटत असे. कालांतराने मी देखील सर्वांबरोबर ध्यानाला बसू लागले.
तेव्हा श्रीअरविंद यांनी भेटीसाठी सर्वांना एकत्रित बोलाविले. ते स्वत: बसले आणि त्यांच्या शेजारी मला बसवून घेतले आणि ते बोलू लागले, “मी येथे तुम्हाला असे सांगायला बोलाविले आहे की, आजपासून मी माझ्या साधनेसाठी म्हणून एकांतवासात जात आहे. यापुढे आता तुमच्या प्रत्येकाची जबाबदारी श्रीमाताजी घेतील. तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते तुम्ही त्यांना सांगावे. त्या माझे प्रतिनिधित्व करतील आणि त्याच सर्व कार्य करतील.” (येथेच प्रथमच ‘श्रीमाताजी’ हा शब्द श्रीअरविंदांकडून उच्चारण्यात आला होता, पूर्वी श्रीअरविंद त्यांना ‘मीरा’ असे संबोधत असत.)
सर्वजण त्यांना विचारू लागले, “असे का? असे का?” ते म्हणाले, “ते तुम्हाला सांगण्यात येईल.” मी कोणतीच गोष्ट स्पष्ट करू इच्छित नव्हते म्हणून मी खोलीत जाण्यासाठी म्हणून त्यांच्याबरोबरच बाहेर पडले पण तेवढ्यात दत्ता या साधिकेने बोलायला सुरुवात केली. दत्ता या एक इंग्लिश साधक होत्या. आणि त्या माझ्यासोबतच युरोप सोडून येथे आल्या होत्या. त्यांना काही ‘अंत:प्रेरणा’ येत असत… दत्ताने सगळ्यांना सांगितले की, श्रीअरविंद त्यांच्या माध्यमातून बोलत आहेत अशी त्यांना जाणीव झाली आहे आणि मग त्यांनी सारे काही स्पष्ट करून सांगितले. ते असे की, “श्रीकृष्णाचे अवतरण झालेले आहे. श्रीअरविंद आता अतिमानसाच्या अवतरणासाठी खूप कठोर साधना करणार आहेत; या सगळ्याचा अर्थ असा की, श्रीकृष्णाची पृथ्वीवरील अतिमानसाच्या अवतरणाला संमती आहे. आणि आता येथून पुढे श्रीअरविंद त्या कार्यामध्ये इतके व्यग्र होऊन जातील की, त्यामुळे त्यांना आता लोकांशी भेटणे-बोलणे शक्य होणार नाही आणि म्हणून त्यांनी श्रीमाताजींकडे ही जबाबदारी सोपविली आहे. आता पुढील सारे कार्य त्याच पाहतील.” हा दिवस होता, २४ नोव्हेंबर १९२६. तेव्हापासून हा दिवस श्रीअरविंद आश्रमात ‘सिद्धी-दिन’ म्हणून ओळखला जातो.
(क्रमश:)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind Part36