श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमाला-३३:
श्रीअरविंद- क्रांतिकारक ते महायोगी:
दिव्य माणूस घडविणे
‘आर्य’च्या प्रकाशनाला सुरुवात केल्यानंतर श्रीअरविंद घोष यांना काही पदवीधर युवकांचे एक पत्र आले आणि त्यात त्या युवकांनी विचारले होते की, ज्यामधून ‘माणसाची जडणघडण’ होईल असे काही लिखाण तुम्ही आर्य मध्ये द्याल का? त्यावर श्रीअरविंद घोष यांनी उत्तर दिले…
”माणूस घडविण्याचा माझा वाटा मी उचलला आहे आणि ही अशी गोष्ट आहे की, आता ती कोणीही करू शकतो. अखिल विश्वामध्ये स्वतः प्रकृतीच (Nature) आता त्याकडे लक्ष पुरवीत आहे, अन्य ठिकाणच्या तुलनेत भारतातच तिचे कार्य संथपणे चालू आहे. आता ‘माणूस घडविणे’ नाही; तर ‘दिव्य माणूस घडविणे’ हे माझे कार्य आहे.
माझी सध्याची शिकवण ही आहे की, हे जग एका नवीन प्रगतीसाठी, एका नवीन उत्क्रांतीसाठी तयार होत आहे. जो कोणता देश, जो कोणता वंश या नवीन उत्क्रांतीची दिशा पकडेल आणि त्याची परिपूर्तता करेल तो देश, तो वंश या मानववंशाचा नेता असणार आहे. या नवीन उत्क्रांतीचा पायाभूत विचार कोणता असणार आहे आणि ही नवीन उत्क्रांती कोणत्या योगपद्धतीने साध्य होऊ शकेल याचे मला जे दर्शन झाले ते मी ‘आर्य’मध्ये मांडले आहे. ज्यांना जाणून घ्यावयाची इच्छा आहे, त्यांच्यासाठी तो संदेश तेथे आहे.
वस्तुतः त्याचे तीन भाग आहेत.
१) प्रत्येक मनुष्याने व्यक्ती म्हणून स्वतःला भविष्यकालीन दिव्य मानवतेच्या प्रकारामध्ये परिवर्तित करावे, उदयाला येण्यासाठी धडपडणाऱ्या नवीन सत्ययुगातील माणूस बनावे.
२) मानववंशाचे नेतृत्व करू शकतील अशा माणसांचा एक वंश विकसित करावा.
३) आणि या पथदर्शक लोकांच्या नेतृत्वाखाली, या निवडक वंशाच्या लोकांच्या नेतृत्वाखाली, या मार्गावरून वाटचाल करावी यासाठी म्हणून समस्त मानवजातीला आवाहन करावे.
(क्रमश:)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Article Series ShreeArvind Part33