इंडिया दर्पण विशेष लेखमाला – सुप्रसिद्ध दत्तस्थाने
दत्त भक्तांची आळंदी : श्री क्षेत्र बाळेकुंद्री
श्री दत्त नवत्रोत्सवा निमित्त इंडिया दर्पणने सुरु केलेली “दिगंबरा दिगंबरा” ही विशेष लेख माला वाचकांच्या पसंतीस पड़त आहे. हे पाहून खुप छान वाटतय. दत्त स्थानातील प्रमुख संचालक आणि पुजारी यांचाही प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक आहे.
गुरुदेव दत्त अवतार “योगीजनवल्लभ” आणि ” लिलाविश्वंभर”
आज आपण श्रीदत्त गुरुंच्या सोळा अवतारांपैकी पाचव्या आणि सहाव्या अवतारा विषयी माहिती घेणार आहोत.
गुरुदेव दत्तांचा पाचवा अवतार “योगीजनवल्लभ” नावाने प्रसिद्ध आहे. कालाग्निशमनाच्या दर्शनास देव, ऋषि, गंधर्व, यक्ष व किन्नर जमा झाले. तेव्हा दत्तात्रेयानी आपल्या बालरुपाचा त्याग करुन योगीजनांना प्रिय असे रुप धारण केले. हे अवतार ‘योगिजनवल्लभ’ या नावाने प्रसिद्ध आहे.

मो. ९४२२७६५२२७
गुरुदेव दत्तांचा “योगीजनवल्लभ” हा अवतार मार्गशीर्ष शुद्ध१५ ला जन्मास आला,असे मानतात. हीच दत्तजयंती म्हणून आपण साजरी करतो. अनसूया मातेच्या आश्रमात जेव्हा श्री दत्तात्रेय अवतरित झाले, तेव्हा प्रभूंचे रूप पाहण्यासाठी इंद्रादी देव, ऋषी-मुनी, गंधर्व, चरण, योगी आणि संत त्यांना भेटायला आले. त्या सर्वांची ती उत्सुकता पाहता, श्री दत्तात्रेय एका कुमाराचे रूप धारण केले आणि त्यांना योगाचे मार्गदर्शन केले. हे अवतार योगाच्या प्रचारासाठी तसेच योगाभ्यासातील अडथळे दूर करण्यासाठी आणि योगाच्या अनुयायांना आशीर्वाद देण्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच या अवतारला ‘योगिजन वल्लभ’ म्हणून ओळखले जाते.
गुरुदेव दत्तांचा सहावा अवतार ” लिलाविश्वंभर” नावाने ओळखला जातो.
ज्यावेळी लोक अवर्षणामुळे अन्नान्न दशेस लागले होते तेव्हा दत्तात्रेयांनी लोकांचे कल्याण करण्यासाठी हा अवतार घेतला. ” लिलाविश्वंभर” अवताराची जन्मतिथी पौष शुद्ध १५ मानली जाते. या अवतारात श्रीदत्तात्रेयांचे मुलांसाठीचे प्रेम आणि प्रखर दयाळूपणा पाहण्यासारखा आहे. त्या काळात देशात एक भयंकर दुष्काळ पडला होता. प्राणी अन्न आणि पाण्याविना पार सुकून गेले होते. चोर आणि दरोडेखोर यांनी लोकांना अन्नपाण्यासाठी लुटणे चालू केले होते.
ऋषी-मुनी त्यांची उपासना करू शकत नव्हते आणि यज्ञव्यवस्था जवळपास मोडकळीस आली होती. तेव्हा सगळे ऋषी मुनी ब्राह्मण इत्यादींनी श्री दत्तप्रभूंना शरण गेले. भक्तांची प्रार्थना ऐकून श्री दत्तप्रभू त्यांच्यासमोर “लीला विश्वंभर” म्हणून प्रकट झाले आणि सर्वांना अन्न, वस्त्रे आणि धनधान्ये दिली आणि त्या सर्वांना संतुष्ट केले. हे सर्व त्यांनी लीलया केले आणि म्हणून या अवताराला ‘लीला विश्वंभर’ म्हणून ओळखले जाते.
श्री क्षेत्र बाळेकुंद्री
श्री गुरुदेव दत्तांची उपासना संपूर्ण देशभर केली जाते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून बंगाल पर्यंत सर्वत्र दत्त मंदिर असल्याचे आढळून येते. आज आपण कर्नाटक राज्यातील बेळगावच्या पूर्वेस १२ कि. मी.,अंतरावर असलेल्या बेळगाव कलाउगी मार्गावरील श्रीक्षेत्र बाळेकुंद्री या दत्त स्थानाची माहिती घेणार आहोत.एखाद्या देवाच्या भक्तीरसांत आई-वडिलांसह सर्व मुलं रंगलेली उदाहरने तशी दुर्मिळ आहेत. आपल्या महाराष्ट्रांत संत ज्ञानेश्वर त्यांचे वडिल व आई तसेच मोठे बंधू निवृत्तिनाथ,लहान बंधू सोपानदेव आणि धाकटी भगिनी मुक्ताई हे पांडुरंगाच्या भक्तीरसांत डुंबून गेलेले आपल्याला ठाऊक आहे. अगदी तसेच कर्नाटकातील पंत महाराज बाळेकुन्द्रीकर नावाचे दत्त भक्त आपले माता पिता आणि सर्व बंधूसह गुरुदेव दत्तांच्या भक्तीत एकरूप झाले होते. वारकरी संप्रदायात आळंदीला जे महत्व आहे तेच महत्व दत्त संप्रदायात श्रीक्षेत्र बाळेकुंद्री या दत्त स्थानाला दिले जाते.
पंत महाराज बाळेकुंद्रीकर
दत्त परंपरेत पंत महाराज बाळेकुंद्रीकर नावाचे थोर दत्त भक्त होउन गेले श्रीपंत महाराज हे फार मोठे दत्तभक्त होते. त्यांनी बालावधूत महाराजांकडून अवधूत पंथाची दिक्षा घेतली होती. श्रीपंतमहाराजांनी मराठी आणि कन्नड भाषेमध्ये विपुल लिखाण केले आहे. त्यांनी रचलेली दत्तात्रेयांची शेकडो पदे, भजने, आरत्या उपलब्ध आहेत. तसेच त्यांनी भक्तांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये श्रीरामावधूतांवर कृपा केली. श्रीरामावधूतांनी श्रीबालावधूतांवर कृपा केली. आणि श्रीबालावधूतांनी श्रीपंतमहाराजांवर कृपा केली अशी ही परंपरा आहे. या परंपरेबाबत ‘अनादिसिद्ध श्रृतीसंमत संप्रदाय’ असा उल्लेख श्रीपंतमहाराजांनी केला आहे. श्रीदत्तात्रेयावर आणि अवधूतांवर निरतिशय प्रेम हीच अवधूत परंपरेची साधना आहे.
बेळगावच्या पूर्वेस बेळगावपासून बागलकोट रस्त्यावर सुमारे १२ कि. मी. अंतरावर पूर्वीच्या सांगली संस्थानापैकी बाळेकुंद्री बुद्रुक या नावाचे खेडे आहे. हा गाव त्यावेळीच्या सदर्न मराठा रेल्वेस्टेशन सुळे भावीपासून ३ कि. मी. अंतरावर आहे. यागावी पूरातन श्रीरामेश्र्वराचे जागृत देवस्थान आहे. येथे दोन-चार तलाव असून अंदाजे ५’ – ७’ खोलीवर मुबलक अमृततुल्य पाणी लागते. त्यामुळे येथे गुप्तगंगा आहे अशी अख्यायिका आहे.
आधुनिक काळातील संत
येथे अवधूत संप्रदायाचे एक शक्तीपीठ आहे. अनादि काळापासून चालत आलेल्या अवधूत संप्रदायाला तळागाळातील लोकांपर्यंत पोचविणारे आधुनिक काळातील (इ. स. १८५५ ते १९०५) संत म्हणजेच श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर. त्यांचे लौकिक नाव दत्तात्रय कुलकर्णी. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या विसाव्या वर्षी श्रीबालमुकुंद तथा बालावधूत-पाश्र्ववाड, जिल्हा बेळगांव, यांच्याकडून त्यांना अनुग्रह मिळाला. श्रीपंतांना सद्गुरूंचा सहवास जेमतेम दोन वर्षे लाभला. पण परिसाच्या एकदा झालेल्या स्पर्शाने ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते, तद्वतच श्रीपंतांचा कायापालट झाला.
श्रीपंतांचे बेळगाव येथील घर म्हणजे गुरुकुल होते. आपल्या सद्गुरूंनी पंथ विस्ताराची सोपविलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. जात-पात, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, धर्म, पंथ वा अन्य कोणताही भेद न करता सर्वाना अवधूत संप्रदायाच्या विशाल विश्वाचा परिचयच नव्हे, तर त्यांनी अनुभव घडविला.
श्रीपंत म्हणतात, “अवधूतमार्गात पहिल्याने आलेल्यास आपला करून घेणे, तो पापी, दुराचारी, चांडाळ, दुष्ट, शिष्ट कसाही असो. शरण आला तर तो तसाच मुक्त होऊन पार पाडण्यासाठी आला आहे. अन्य आश्रमी गुरू असमर्थ असल्यामुळेच तो निराश्रमी-अतिआश्रमी अशा अवधूतास जो शरण आला तो तात्काळ मुक्त झालाच.” अवधूतमार्ग म्हणजे अद्वैतानुभव. अवधूतांना मुक्तीची फिकीर नाही. भक्ती ही गुरुप्रेमासाठी. म्हणून श्रीपंत आपल्या शिष्यांना ‘गुरुपुत्र’ म्हणत. असा ‘जिव्हाळा-प्रेम’ हा या पंथाचा आत्मा आहे.
‘जसा मन आहेस तसा मीळ’ (जसा आहेस तसाच मला येऊन मिळून जा, माझ्यात मिसळून जा असा अर्थ) हाच त्याचा बोध. म्हणून श्रीक्षेत्री असलेल्या पादुकांची पूजा कोणालाही करण्याची पूर्ण मुभा आहे. ‘नीतीने उद्योग कर, धंदा कर, खुशाल राहा. भिक्षा मागू नये. लोकांना त्रास देऊ नये. संन्यासी बनू नका. संसारात राहूनही परमार्थ करा. असा कर्म – मार्गाला प्राधान्य देणारा उपदेश केला असून अवडंबरापेक्षा सहजतेला महत्त्व देणारा हा पंथ आहे.
श्रीपंतमहाराजांनी निर्माण केलेले साहित्य
श्री पंत महाराजांनी निर्माण केलेले विपुल वाङ्मय आज उपलब्ध आहे. यांत १. श्रीदत्तप्रेमलहरी २. श्रींची पत्रे ३. भक्तालाप ४. स्फुटलेख ५. बोधवाणी ६. बाळबोधामृतसार ७. भक्तोद्गार अथवा प्रेमभेट ८. आत्मज्योती-अनुभववल्ली-ब्रह्मोपदेश ९. प्रेमतरंग यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ‘परमानुभवप्रकाश‘, ‘श्रीपंत महाराजांचे चरित्र’, ‘श्रीपंत गुरुचरित्र पोथी’, श्रीपंत बंधू गोविंददादा यांनी श्रीपंथांच्या सन्निध आलेले उत्कट अनुभव लिहिलेले ‘गोविंदाची कहाणी’ इ. बोधपर वाङ्मय उपलब्ध आहे.
श्री पंत महाराज समाधिस्थ झाल्यावर असंख्य भक्तगणांचे सुचनेवरून बाळेकुंद्री येथे पौष शु. १ शके १८२८ म्हणजे दि. २७-१२-१९०५ या दिवशी सर्व ठिकाणच्या भक्तमंडळींनी जमून ‘श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री बु॥’ या संस्थेची स्थापना केली व पुढे २५-२६ वर्षांच्या कालात श्रीपंतबंधुंच्या हयातीतच श्रीदत्तसंस्थानचा पसारा वाढत गेला आणि त्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी त्यांनी भक्तमंडळींशी विचारविनिमय करून व अत्यंत नि:स्वार्थीपणे पण दूरदृष्टी ठेवून एक कायदेशीर ट्रस्ट करून मिती ज्येष्ठ शु. ८ शके १८५५ दि. १-६-१९३३ रोजी तो रजिस्टर केला आणि योजनाबद्ध ‘घटना व नियम’ तयार करून श्रीदत्तसंस्थानाच्या कार्यास एक प्रकारची सूत्रबद्ध गती दिली व सन १९५२ मध्ये ‘बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट’ प्रमाणे श्रीदत्तसंस्थानची सरकारात रीतसर नोंद होऊन त्याप्रमाणे सध्या संस्थेचे कामकाज चालू आहे. संस्थेचा कारभार लोकशाही तत्वावर चालतो.
श्री पंतमंदिर
श्रीपंतमहाराजांच्या पार्थिव देहास श्रीक्षेत्री जेथे अग्निसंस्कार झाला, त्या ठिकाणी लावलेल्या औदुंबराच्या रोपाभोवती एक चिरेबंदी षट्कोनी पार इ. स. १९०६मध्ये बांधण्यात आला. पुढे २४ वर्षांनी म्हणजे दि. ६ जानेवारी सन १९३० रोजी, त्या पारास लागूनच पूर्वेस, श्रीपंतबंधू गोविंदरावदादा यांचे हस्ते श्रीपंतमंदिराचा पाया घातला गेला. या चौथऱ्याचे बांधकाम पूर्ण होताच त्यावर मिती आश्र्विन वद्य २ शके १८५२ (ता. ९-१०-१९३०) गुरुवार रोजी दुपारी बारा वाजता, शुभ मुहुर्तावर श्रींच्या पादुका व फोटो यांची मोठ्या समारंभाने शास्त्रोक्त विधियुक्त स्थापना करण्यात आली.या कालावधीत ‘श्रीदत्ततीर्थ’ धर्मशाळा (यातच हल्ली श्रीसंस्थानची कचेरी आहे), श्रीनरसिंहमंदिर, श्रीसीताराममंदिर, श्रीपंतमातोश्री तुळशीवृंदावन, श्रींच्या कट्ट्यासमोरील प्रशस्त भजनमंडप, तसेच इतर भक्तमंडळींनी बांधलेल्या धर्मशाळा इत्यादी इमारती झाल्या. पुढे ‘श्रीपंतमंदिरनिधी’ श्रीभक्तांकडून उत्स्फूर्त जमा होऊन संस्थानने सन १९५३मध्ये सध्याचे टुमदार व शोभिवंत असे मंदिर बांधले.
श्री पंत मातोश्री – तुळशी वृंदावन
श्रीपंतांच्या मातोश्री प. पू. गं. भा. सीताबाई या श्रावण शु. १५ शके १८५० (३१-८-१९२८) रोजी देवाधीन झाल्या. मातोश्रींचे स्मारक म्हणून त्या दहनभूमीवर एक सुंदर संगमरवरी तुळशीवृंदावन बांधण्यात आले. हे संगमरवरी वृंदावन बिकानेरहून करवून आणले आहे.
श्री पंत बंधू गोविंदरावदादा-प्रेमध्वज-कट्टा
श्रीपंतबंधू गोविंदरावदादा हे श्रावण शु. ३ शके १८५७ (२-८-१९३६) रोजी श्रीपंतस्वरूपी विलीन झाले.त्यांचे स्मारक म्हणून एक सुंदर संगमरवरी दगडाचा चबुतरा बांधून त्यावर पादुका व त्यामागे श्रींचा प्रेमध्वज उभा करण्यात आला आहे. हा संगमरवरी चबुतराही राजस्थानमधून करवून आणला असून थोड्याच अंतरावर ‘श्रीगोविंदभुवन’ नावाची एक लोखंडी, भव्य व प्रशस्त अशी एक धर्मशाळा बांधलेली आहे.
श्रीदत्त तीर्थ
श्रीपंत मंदिरानजीक श्रीदत्ततीर्थ ही विहीर असून त्यात श्रीपंत-मातोश्रींनी श्रीपंतांचे मामा श्रीपादपंत यांनी काशीक्षेत्राहून पाठविलेले पवित्र गंगाजल घातले आहे. श्रीक्षेत्रातील सर्व मंडळी याच विहिरीचे पाणी वापरतात व येणारे भाविक यात्रेकरू तीर्थ म्हणून ते ग्रहण करतात.
श्री औदुंबर कट्टा
श्री पंत मंदिराच्या मागचे बाजूस लागूनच श्रीऔदुंबरकट्टा हे पवित्र स्थान आहे. त्या ठिकाणी श्रीपंतबंधू गोविंदरावदादा यांनी लावलेला औदुंबराचा वृक्ष आता पुष्कळच मोठा झाला असून त्यासभोवती चिरेबंदी षट्कोनी कट्टा बांधलेला आहे व त्यावर काँक्रीटची छत्री बांधलेली आहे. औदुंबरवृक्षाजवळ श्रींच्या पादुका ठेविल्या आहेत. त्या ठिकाणी भक्तमंडळी अनुष्ठान वगैरे करतात.
सीताराम मंदिर
श्रीपंतांच्या मातोश्री ‘श्रीसीताबाई’ व वडील ‘श्रीरामचंद्रपंत’ यांचे स्मरणार्थ हे ‘सीताराम मंदिर’ इ. स. १९३७मध्ये मुंबईचे एका धनिक श्रीपंतभक्त कै. मुकुंदराव दादाजी राणे यांनी बांधविले. या मंदिरात श्रीपंतांच्या पूजेतील श्रीदत्तात्रेयांचा फोटो, श्रीपंतबंधू गोविंदरावदादा यांच्या पादुका, श्रींचा पालखीसेवेसाठी पूजेतील फोटो वगैरे पूज्य वस्तू ठेवल्या असून प्रत्येक पालखीसेवेस या मंदिरापासून आरंभ होण्याचा प्रघात आहे.
नरसिंह मंदिर
श्री पंत मंदिराचे पिछाडीस नरसिंह मंदीर आहे; त्या ठिकाणी श्रीपंतांचा बसण्याचा कोच, एकतारी श्रीपंत व सौ. यमुनाक्का, श्रीपंत बंधू व मातोश्री यांचे फोटोही दर्शनासाठी ठेवलेले आहेत. पंत महाराजांच्या पूण्यतिथी उत्सवाची श्री प्रेमध्वजाची मिरवणूक येथूनच निघते. भक्तमंडळी येथीलच पवित्र विभूती घेऊन जातात.
येथे सभागृह, भक्त निवास, भोजन कक्ष इ. स्थाने अत्यंत पवित्र आणि रमणीय आहे. श्री गुरूपादुका व श्री महाराजांच्या पादुकांवर अभिषेक लघूरुद्र पूजा इ. सेवा भक्त करू शकतात.१९०५ सालापासून श्री दत्तसंस्थान बाळेकुंद्री स्थापन होऊन रजिस्टर्ड ट्रस्ट आहे. श्री पंत महाराजांचे बंधू परिवाराने या संस्थानला मोठे योगदान दिले. भारतभर पसरलेले भक्त संस्थानला सर्वार्थाने सहकार्य करीत आहेत.
श्रीक्षेत्र बाळेकुंद्री येथे राहण्यासाठी भक्त निवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. अतिशय रमणीय असा हा परिसर आहे. ज्ञानेश्वर माउलींची आळंदी किंवा श्री गजानन महाराज यांचे शेगाव या ठिकाणी गेल्यावर जी शांतता आणि मानसिक समाधान भाविकांना लभते तेच श्रीक्षेत्र बाळेकुंद्री येथेही मिळते असा अनेक भाविकांचा अनुभव आहे.
संपर्क
श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री, श्रीक्षेत्र बाळेकुंद्री बेळगाव.
दूरध्वनी : (०८३१) २४१८२४७ / २४१८४८०
वेबसाईट – www.panthmaharaj.com
संदर्भ : श्री गुरुचरित्र व संकेतस्थळे