नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रत्येक स्मार्टफोन युजरला दिवसातून कधी तरी अनवॉन्टेड कॉल येतातच. तसेच दररोज अनेकांना कंपन्यांचे बोगस संदेशही सतत येत असतात अर्थातच ग्राहकांना तथा युजर्सना याचा खूप त्रास होतो. आपण महत्वाच्या कामांमध्ये असताना असे कॉल्स आले तर खूप संताप होतो, खरेच असा वैताग येणे साहजिक आहे मात्र या अनवॉन्टेड कॉल्सना आपण वैतागला असाल तर, आता काळजी करण्याची गरज नाही. कारण मोबाईल फोन युजर्सना स्पॅम कॉल्स आणि फसव्या तसेच बनावट संदेशांपासून लवकरच सुटका होणार आहे. या संदर्भात नवीन दूरसंचार विधेयक लवकरच येणार असून या गोष्टींना चाप बसून ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे दूरसंचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी सांगितले.
सुमारे ६५ टक्के भारतीयांना दररोज तीन किंवा त्याहून अधिक स्पॅम कॉल येतात. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या डू नॉट डिस्टर्ब यादीतील ९५ टक्के मोबाइल युजर्सनी त्यांच्या फोनवर सतत नको असलेले आणि त्रासदायक कॉल येत असल्याचे सांगितले. जेव्हा एखाद्या बँकेकडून कॉल करत आहे, असे कॉल समोरून येतात, तेव्हा तुमची फसवणूक देखील होऊ शकते, तसेच काही जणांना अनोळखी नंबरवरून धमक्या येतात. म्हणून युजर्सच्या संरक्षणासाठी आणि सायबर फसवणूक रोखण्यासाठी या विधेयकाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, नवीन दूरसंचार विधेयक नऊ ते दहा महिन्यांत आणले जाऊ शकते . विचारविनिमय प्रक्रियेनंतर आम्ही त्याचा अंतिम मसुदा तयार करू, त्यानंतर संबंधित संसदीय समितीसमोर जाईल. मग तो संसदेत आणला जाईल. पण हे विधेयक भारतीय टेलिग्राफ कायदा १८८५, इंडियन वायरलेस टेलिग्राफ मेकॅनिक्स कायदा १९३३ आणि टेलिग्राफ मेकॅनिझम कायदा, १९५० या तीन कायद्यांची जागा घेईल. तसेच संबंधित, विधेयकाच्या मसुद्यावर तपशीलवार सादरीकरण करताना वैष्णव म्हणाले की, नवीन दूरसंचार विधेयक उद्योगाची पुनर्रचना करण्यासाठी आणि नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी एक स्पष्ट मार्ग मोकळा करेल. सरकार येत्या दीड ते दोन वर्षांत संपूर्ण डिजिटल नियामक फ्रेमवर्कमध्ये सुधारणा करणार आहे.
टेलिकॉम बिल-२०२२ च्या मसुद्यानुसार, ‘ओव्हर-द-टॉप’ अॅप्स म्हणजे ‘कॉलिंग’ आणि ‘मेसेजिंग’ सेवा प्रदान करणाऱ्या व्हॉट्सअॅप, झूम आणि गुगल डीओ यांना ऑपरेट करण्यासाठी परवाना आवश्यक असू शकतो. या विधेयकानुसार, सर्व इंटरनेट कॉलिंग आणि मेसेजिंग अॅप्सना केवायसी तरतुदीचे पालन करावे लागेल. प्रथम प्राधान्य युजर्सच्या सुरक्षिततेला आहे आणि प्रत्येक ग्राहकाला कॉल कोण करत आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. तसेच केवायसी नियमांमुळे सायबर फसवणूक रोखण्यात मदत होईल, असेही ते म्हणाले.
Spam Calls Bogus Messages New Changes Telecom Bill