इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काही व्यक्तींना संपत्तीची आणि मालमत्तेची प्रचंड हाव असते. या हव्यासापोटी ते आपल्या नातेवाईकांचा देखील खून करतात. अगदी जन्मदात्या आई-वडिल किंवा रक्ताच्या नात्यातील कुणाचाही. अशा राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्ती समाजासाठी घातक ठरतात. असाच एक भयानक प्रकार उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात घडला आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे सेवानिवृत्त उपव्यवस्थापक महमूद अली खान (६५), त्यांची पत्नी दरक्षा (६२) आणि मुलगा चावेझ (२६) यांचा निघृण खुन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मोठा मुलगा सर्फराज यानेच हे तिहेरी हत्याकांड केले आहे. या हत्याकांडात त्याने अनिल यादव या व्यक्तीचीही मदत घेतली. पोलिस चौकशीत या हत्याकांडाचा भयानक उलगडा झाला आहे. सर्फराजने फिल्मी स्टाईलद्वारे हत्येची योजना आखली. आई-वडील आणि भावाच्या जेवणातील मसूर डाळीत सर्फराजने झोपेच्या तब्बल ९० गोळ्या मिसळल्या. या तिघांचे जेवण झाल्यानंतर त्याने अनिलच्या मदतीने तिघांचेही चाकूने गळे चिरले आणि त्यांना ठार केले.
घरातील तिघांची हत्या उघड होऊ नये म्हणून सर्फराजने एक बनाव रचला. आपली बहीण अनम आणि शेजाऱ्यांना सांगितले की, ते तिघे जम्मूला नातेवाईकांना भेटायला आणि सहलीवर फिरायला गेले होते. तिथल्या रामबन भागात भूस्खलनात बेपत्ता झाले असावेत. पोलिसांनी आरोपी सर्फराज आणि अनिलला अटक करून चौकशी केली तेव्हा सर्फराजने इटौंजा, मलिहाबाद आणि माळ परिसरात वेगवेगळ्या वेळी तिघांचे मृतदेह फेकल्याची कबुली दिली. त्यानंतर या प्रकरणात गळा चिरून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अनिलने पाच लाख रुपये मागितले होते, मात्र नंतर एक लाख ८० हजारांत प्रकरण मिटले, असेही सरफराजने सांगितले.
सर्फराज याने परस्पर प्रेमविवाह केल्यामुळे कुटुंबीयांना त्याचा राग येऊ लागला होता. त्यामुळे त्याला मालमत्तेचा वाटा मिळणार नव्हता. तसेच त्याला घराबाहेर काढायचे ठरवले होते. तर, संपूर्ण कुटुंब लहान भाऊ चावेझ याच्याशी अधिक जवळकीने वागत होते. तसेच कोट्यवधींची मालमत्ताही चावेझ यालाच द्यायची ठरली होती. त्यामुळेच सर्फराजने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
शेजारी आणि नातेवाईक यांच्या सांगण्यानुसार, सर्फराज याची वागणूक चांगली नव्हती. त्यामुळे घरच्यांनी त्याच्याकडे फारसे चांगले लक्ष दिले नाही. तसेच सर्फराजने पाच वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या संमतीशिवाय लग्न केले होते. तेव्हा त्याच्यासोबतचे नाते संपवण्याचे ठरवले होते. त्याला भीती वाटत होती की, त्याचे वडील आपल्या धाकट्या भावाच्या नावावर सर्व मालमत्ता करून देऊ शकतात. त्यात विकासनगर येथील एका घराची किंमत अंदाजे ३ कोटी रुपये असल्याने अशा परिस्थितीत सर्फराजने कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणी सर्फराज आणि अनिल यांना पोलिसांनी अटक केली आहे. हत्येची कबुली देताना आरोपी सर्फराजने सांगितले की, त्याने आई, वडील आणि भावाला मारण्यासाठी मसूर डाळीत झोपेच्या ९० गोळ्या मिसळल्या. डाळीत गोळ्या टाकल्याने त्याचा वास येत नाही. मसूर डाळ खाल्ल्यानंतर तिघेही बेशुद्ध पडले. तिघांचाही गळा चिरण्याचा प्रयत्न केला, मात्र हे काम करू शकलो नाही. मग रात्री उशिरा मी अनिलला घरी बोलावले. अनिलने चाकूने एकामागून एक अनेक वार केले. तिघांचीही बेडरूममध्ये हत्या करण्यात आली. त्यानंतर या तिन्ही मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली, असे त्याने पोलिसांना सांगितले.