नवी दिल्ली – देशाचे १४ वे राष्ट्रपती असलेल्या रामनाथ कोविंद यांच्या खासगी आयुष्याबद्दलची माहिती तुम्हाला ठाऊक आहे का? शालेय जीवनात वडिलांच्या अनुपस्थितीत किराणा दुकान सांभाळणारे रामनाथ कोविंद, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरी नाकारणारे रामनाथ कोविंद आणि वकिली करून नंतर राजकारणात प्रवेश करणारे रामनाथ कोविंद यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रपती पदावर विराजमान होणे सर्वोच्च सन्मान समजला जातो. या पदावर विराजमान झाल्यानंतर सिंहावलोकन करताना या पदापर्यंतची त्यांची वाटचाल निश्चित सोपी नव्हती. कसा होता रामनाथ कोविंद यांचा प्रवास, याबद्दलची आणखी काही रोच माहिती जाणून घेऊयात.
कुटुंबातील टोपण नाव
उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील परोख या गावात १ ऑक्टोबर १९४५ रोजी रामनाथ कोविंद यांचा जन्म झाला होता. पाच भावांमधील सर्वात लहान रामनाथ कोविंद यांना कुटुंबात लल्ला असे म्हटले जायचे. आई-वडिलांच्या निधनानंतर वहिनी विद्यावती यांनी त्यांना वाढविले. वहिनींना ते आईच्या जागी मानतात. वहिनी विद्यावती यांनी बविलेला कढी-भात रामनाथ कोविंद यांना खूपच आवडत असे.
किराणा दुकान बसणारे रामनाथ कोविंद
राष्ट्रपती रामनाथ कोविंद लहान असताना त्यांचे वडील मैकुलाल कोविंद हे उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील परोख या गावात किराणा दुकान चालवत होते. त्यांचे वडील ग्रामस्थांना आयुर्वेदिक औषधेही देत होते. शाळेतून परतल्यानंतर रामनाथ कोविंद वडिलांचे दुकान सांभाळत होते. त्या दिवसांत त्यांच्याकडे शेतीसाठी जमीन नव्हती. रामनाथ कोविंद यांचे भाऊ प्यारेलाल यांचे आजही किराणा दुकान आहे.
यूपीएससीची नोकरी नाकारली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्राथमिक शिक्षण संदलपूर प्रखंड येथील शाळेत झाले होते. पुढे त्यांनी डी.ए.व्ही. महाविद्यालयातून बी. कॉम, आणि डी.ए.व्ही. विधी महाविद्यालयातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची परीक्षा तिसर्या प्रयत्नात उत्तीर्ण केली होती. त्यांची संबद्ध सेवेतही नियुक्ती झाली होती. परंतु त्यांनी ही नोकरी नाकारली. १९७७ पासून १९९३ पर्यंत १६ वर्षे दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली. १९७८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात त्यांची वकील म्हणून नोंदणी झाली होती. १९७७ ते १९७९ पर्यंत ते दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील तसेच १९८० ते १९९३ पर्यंत सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचे कायमस्वरूपी सल्लागार होते.
पहिल्या निवडणुकीत स्कूटरवर प्रचार
आपल्या राजकीय कारकीर्दीत राष्ट्रपती कोविंद यांनी प्रथम १९९० मध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर घाटमपूर लोकसभा मतदार क्षेत्रातून निवडणूक लढविली होती. निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी वाहन मिळू न शकल्याने त्यांनी गावागावात स्कूटरवरून प्रचार केला होता. या निवडणुकीत ते पराभूत झाले. एप्रिल १९९४ मध्ये प्रथमच उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार झाले. त्यानंतर ते दोन वेळा १२ वर्षांपर्यंत राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. १९९४ मध्ये राज्यसभेचे सदस्य झाल्यानंतरही ते कानपूर येथील कल्याणपूरमध्ये जवळपास एक दशकापर्यंत भाड्याच्या घरात राहिले होते. ८ ऑगस्ट २०१५ ते २५ जुलै २०१७ या काळात ते बिहारचे राज्यपाल होते.