मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह याची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव गटाच्या वकिलांनी आव्हान देत या प्रकरणाची सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या वकिलाला उद्या या प्रकरणाचा उल्लेख करण्यास सांगितले आहे. आता उद्धव ठाकरेंकडे तीन प्रमुख पर्याय असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्याधीच एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी उद्धव गट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, असे या याचिकेत म्हटले आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणी कोणताही निकाल देण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा युक्तिवादही ऐकून घेतला पाहिजे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
वडिलांनी स्थापन केलेला पक्ष निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव यांच्याकडून एका झटक्यात हिसकावून घेतला गेला आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव यांच्यासमोर तीनच पर्याय उरले होते. यामध्ये त्यांनी पहिल्या पर्यायाच्या माध्यमातून प्रयत्नही सुरू केले आहेत. म्हणजे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. उद्धव ठाकरेंच्या पर्यायांबद्दल जाणून घेऊया. तसंच उद्धव शिवसेनेला परत मिळवू शकतील की नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया..
१. सर्वोच्च न्यायालयात जाणे
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देते हे पाहावे लागेल. दोन्ही गटांव्यतिरिक्त न्यायालय या प्रकरणी महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राजभवन, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडून उत्तर मागवू शकते. यानंतरच शिवसेनेवरील शिंदे गटाची पकड कायम राहणार की उद्धव ठाकरे परतणार हे निश्चित होणार आहे. इथूनही उद्धव गटाला धक्का बसला, तर त्यांच्यासमोर एकच पर्याय उरणार आहे.
२. शिंदे गटाशी तडजोड करणे
उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा दुसरा पर्याय आहे. त्यासाठी ते भावनिक भूमिका घेऊ शकतात. पक्षश्रेष्ठींना पुन्हा आपल्या गोटात आणण्यासाठी ते जुने रडगाणे गाऊ शकतात. मात्र, त्याची शक्यता कमी दिसते. आता शिवसेनेची कमान पुन्हा ठाकरे घराण्याकडे जावी असे शिंदे गटाला जराही वाटत नाही. तसेच, आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. दोन्ही गटात मोठेच वितुष्ट निर्माण झाले आहे.
३. जयललिता फॉर्म्युला
उद्धव यांनी जयललिता फॉर्म्युल्याच्या मार्गावर चालण्यास सुरुवात केली आहे. यातूनही उद्धव पुन्हा शिवसेनेवर दावा ठोकू शकतात. १९८७ मध्ये एमजी रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांचा पक्ष एआयएडीएमके (AIADMK) मध्ये दोन गट पडले. पक्षाच्या बहुतांश आमदारांनी रामचंद्रन यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांची बाजू घेतली. जानकी राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. पण, जयललिता यांची संघटनेवर पकड होती. १९८९ च्या राज्य निवडणुकीत जयललिता यांनी जानकी गटापेक्षा चांगली कामगिरी केली. जानकी गटाला नऊ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. तर जयललिता गटाला २२ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. जयललिता यांनी अखेरीस पक्ष संघटनेवर आणि त्यांच्या क्षमतेवर नियंत्रण ठेवून एआयएडीएमकेवर नियंत्रण मिळवले.
भावनिक राजकारणाचा आधार
जर ठाकरे न्यायालयीन लढाईतही हरले आणि शिंदे गटाशी चर्चा झाली नाही, तर उद्धव हे भावनिक राजकारणाचा पत्ता बाहेर काढून तो अतिशय आक्रमक पद्धतीने जनतेपुढे मांडू शकतात. महापालिका निवडणूक हा त्यांच्यासमोरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. जनतेमध्ये जाऊन ते भावनिक प्रचार करू शकतात. पक्षातील लढा आणि जुन्या गोष्टींची आठवण करून देण्याचा प्रयत्न ते करतील. मना निवडणुकीत उद्धव गटाला यश मिळाल्यास ते पुन्हा शिवसेनेच्या नावावर लढण्याचा प्रयत्न करू शकतात. आणि निवडणुकीचा निकाल उद्धव गटाच्या बाजूने लागला नाही, तर निश्चितच त्यांना आणि त्यांचे पुत्र आदित्य यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा फटका बसू शकतो.
Shivsena Politics Uddhav Thackeray 3 Major Options