मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे आगामी काळात राज्यातील सत्तासमीकरणं बदलण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात मुंबई, कल्याण डोंबिवली, औरंगाबादसह अन्य शहरांच्या पालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. अशा स्थितीत महाविकास आघाडी अस्तित्वात आहे की ती फुटली, असा प्रश्न विचारला जात आहे. यासंदर्भात आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्या जे जवळचे होते, त्यांनी धोका दिला. पण या बंडाच्या संकटात माझ्या पाठीमागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी खंबीरपणे उभी राहिली. महाविकास आघाडी कुठेही फुटलेली नाही, एकसंध आहे, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला. खरे तर बंडखोर आमदार-खासदार सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे करत होते. पण विधान भवनात पार पडलेल्या बैठकीला हजेरी लावून महाविकास आघाडी अधिक जोरकसपणे भाजप आणि शिंदे गटासमोर आव्हान उभे करेल, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवत शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नाही, असेही नि:क्षून सांगितले.
विशेष म्हणजे भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात शिवसेना पक्ष ताकदीने महाविकास आघाडीबरोबर उभा असेल, अशी घोषणाच उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष पूर्णपणे खिळखिळा झाला. अनेक विश्वासू आमदार खासदार गेले, सत्ता पालटली. पण अडीच वर्षांआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या महाविकास आघाडीचे नेतृत्व केले, त्या आघाडीपासून फारकत घेणार नसल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली.
मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच विधान भवनाची पायरी चढली. महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी ते विधिमंडळात आले होते. बैठक संपन्न झाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. वास्तविक एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. तेव्हापासून उद्धव ठाकरे मंत्रालयात किंवा विधानभवन परिसरात फिरकले नाही.
महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना त्यांनी आपण विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, अद्याप त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर विधानभवनात महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला उद्धव ठाकरे स्वतः हजर होते.
सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे यांनी यावेळी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच दिवसानंतर आम्ही तिनही पक्षाचे नेते एकत्र भेटलो. चांगल्या गप्पा झाल्या. मी हेच सांगितलं की, महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही कोरोनाचा सामना केला. यापुढे हे संकट काय? जगावर कोरोनाचं संकट असताना आम्ही नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा, एक चांगला कार्यक्रम दिला. त्या संकटापुढे हे संकट काहीच नाही.
तसंच आगामी महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार का? असा प्रश्न विचारला असता आम्ही आता बऱ्याच दिवसांनी भेटलो असून एकत्र भेटून बरं वाटलं. आम्ही फुटलेलो नाही. पुढे काय करायचं ते लवकरच ठरवू आणि तुम्हाला सांगू, असही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाबाबत विचारलं असता मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते, कारण ती सर्वांना समान न्याय देते. पण जनता उघड्या डोळ्यांनी पाहतेय. न्यायदेवता आणि जनता हे आपले दोन आधारस्तंभ जोपर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत देशात लोकशाही जिवंत राहील, बेबंदशाही येऊ देणार नाही, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शिंदे आणि फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली, तसेच पक्षांतर विरोधी कायद्यात हे सरकार टिकणार नाही. एकजुटीने लढायचं या बैठकीत ठरल्याचं पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले.
Shivsena Chief Uddhav Thackeray on Mahaalliance
Congress NCP Politics